राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच ५० हजार रूपयांचा दंडही ठोठावला. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी आणि आमदाराकीवर निर्णय केव्हा अशी विचारणा विरोधकांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आली नसताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मात्र याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.
राज्यात यापूर्वी राज्य आणि केंद्रीय कायद्यातील तरतूदीनूसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एखाद्या आमदार खासदारास एखाद्या गुन्ह्यात देशातील कोणत्याही न्यायालयाने शिक्षा सुनावल्यास त्या आमदार-खासदाराची सदस्यत्व तात्काळ रद्दबातल करण्याची तरतूद आहे. त्यानुसार यापूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राज्यातील काँग्रेसचे आमदार सुनिल केदार यांच्यावरील आरोपात न्यायालयाने दोषी ठरवत या दोघांनाही शिक्षा सुनावली होती. त्यावेळी राज्यातील आणि केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने २४ तासाच्या आत खासदारकी आणि आमदारकी रद्द केली होती.
मात्र माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावून चार दिवस झाले तरी अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येणार आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाची रजिस्टर प्रत अद्याप माझ्या पर्यत आलेली नाही. ती प्रत मिळाल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
पुढे बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, कायद्यातील तरतूदीनुसार न्यायालयाचा निकाल लागल्यापासून सात दिवसांच्या आत ती विधानसभेकडे पाठविणे आणि कारवाई करणे बंधनकारक आहे. तशी तरतूद कायद्यात आहे. परंतु राज्याच्या मुख्य सचिवांकडून सरकारच्या लॉ इनफोर्समेंट कडून ती प्रत मागवून विधानसभेला पाठविल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु मुख्य सचिव कार्यालयाकडून अद्याप तशा पद्धतीची प्रत अद्याप पोहोचली नसल्याचे सांगितले.
दरम्यान, राज्य सरकार आणि राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, राहुल नार्वेकर यांच्या कामाचा आतापर्यंतचा अनुभव पाहता त्यांच्याकडून कायद्याच्या अनुषंगाने योग्य निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा मुळीच नसल्याचे सांगितले.
तर सुषमा अंधारे म्हणाल्या की, मंत्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा न्यायालयाने सुनावून किती दिवस झाले. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. माणिकराव कोकाटे यांना अपीलाच्या संधी पर्यंतचा फिलर भरून काढण्याचे काम सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करत असल्याची टीका केली.
यावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, संजय राऊत यांची अपेक्षा वाया जाणार नाही. त्यांची अपेक्षा निश्चित पूर्ण होईल असे सांगितले. तर सुषमा अंधारे या अजून अंधारात आहेत. त्यांना अनेक गोष्टी माहित नसल्याचे प्रत्युत्तरही यावेळी दिले.
