Marathi e-Batmya

संजय राऊत यांचा आरोप, त्या गाडीत १५ कोटी रूपयेः राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यात विधानसभेची आचारसंहिता १५ तारखेपासूनच लागू झालेली आहे. २० नोव्हेंबरला मतदान होऊन २३ तारखेला निकाल लागणार आहे. तत्पूर्वी, पुण्यातील एका गाडीत ५ कोटी रूपये सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पुण्याजवळील खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ निवडणूक आयोगाच्या चेक पोस्टच्या तपासणीत एका कारमध्ये ५ कोटींची रक्कम सापडली. याप्रकरणी उबाठा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. अशातच आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी ट्वीटरवर खळबळजनक माहिती पोस्ट केली आहे.

खेड शिवापुर टोल नाक्यावर ५ कोटी घेऊन जाताना गाडीत असणाऱ्या चारपैकी एक रफिक नदाफ हा शहाजी बापूंचा अत्यंत विश्वास माणूस, तर दुसरा सागर पाटील बापूंचा सख्खा पुतण्या आहे. तपासयंत्रणांना वेळ मिळणार नाही म्हणून माहिती पुरवली इतकंच! असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

खेड शिवापूर टोलनाक्यावर जप्त करण्यात आलेल्या गाडीमध्ये एकूण चार व्यक्ती होत्या. या चार व्यक्तीं पैकी सागर पाटील (सांगोला), रफीक नदाफ (सांगोला), बाळासाहेब असबे (सांगोला), शशिकांत कोळी (ड्रायव्हर) आहेत. या चार जणांची नावे खेड शिवापूर पोलिस चौकीच्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आली आहेत. यातील रफिक नदाफ नावाच्या व्यक्तीने शहाजीबापू पाटील यांना गुवाहटीला असताना फोन केला होता. त्याच्याशी बोलतानाच शहाजी बापूंनी ‘काय झाडी काय डोंगर’ असा उल्लेख केला होता. तर सागर पाटील हा शहाजी बापूंचा नातेवाईक आहे.

खासदार संजय राऊत यांनी या खळबळजनक घटनेवर ट्विट करताना म्हटलेय की मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले ! हे आमदार कोण? काय झाडी……..काय डोंगार…. …मिंधे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले १५ कोटीचा हा पहिला हप्ता ! काय बापू…..किती हे खोके?

तर… राष्टवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीटरवर म्हटले आहे की, “सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून २५ – २५ कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगर झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत ?लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु,इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ओके करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं!, असं ट्वीटआमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

Exit mobile version