Marathi e-Batmya

सुप्रिया सुळे यांची माहिती, केंद्राच्या अहवालानुसार पुणे क्राईमच्या बाबतीत देशात ५ व्या क्रमांकाचे शहर

केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या गृह विभागाचा अहवाल आहे की, पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय. त्यामुळे, पुण्याच्या पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा. मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. नसरापूर प्रकरणात देखील आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. पोलिसांनी लवकर चार्जशीट दाखल केलं, मात्र हे गुन्हे रोखले पाहिजे. तसेच, हे सरकारचे अपयश आहे, हप्ते घेऊन गुन्हे केले जातायत असा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काँग्रेसमुक्त भारत असं भाजपाचे सगळे नेते म्हणायचे, पण अहिल्यानगर जिल्ह्याचा थोडासा अभ्यास करा,आज भाजपात केवळ राम शिंदे सोडले तर नगर जिल्ह्यातील त्यांचं नेतृत्व हे शंभर टक्के हे ओरिजिनल काँग्रेसचं असल्याचे स्पष्ट केले .
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की,ज्या लोकांना नाकारुन काँग्रेसमुक्त भारत करायचा होता, ते सगळे अहिल्यानगरमधील नेते काँग्रेसचे माजी आमदार-खासदार सगळे भाजपात गेले आहेत. लोकांना बदल हवा होता पण काय बदललं? जी शंभर कुटुंब आधी काँग्रेसमध्ये होती तीच आता भाजपात आहेत. महाराष्ट्रात कुठली क्रांती घडली? ते कुठून लढतात हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असतो. पण मला भाजपाला विचारायचं होतं की, काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का? असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जो आपल्या विचारधारेचा आहे, जो भाजपचा कार्यकर्ता आहे. ज्यानं सतरंज्या उचलल्या, लाठ्या-काठ्या खाल्या त्यांनी संघर्ष केला तेव्हा भाजप विरोधीपक्षात होता पण आता ते कुठे गेले? सध्या प्रकाश जावडेकर कुठे गेले आहेत? त्यांनी लोकशाही मार्गानं आमच्यावर सातत्यानं कठोर टीका केली, ते सभागृहातही आक्रमकपणे बोलायचे. पण आता ते कुठे गेले आहेत? मला आता हळूहळू असं वाटायला लागलं आहे की आता विचारधारा राहिली आहे की नाही? मेरिट हा विषय राहिला आहे की नाही? असा सवालही यावेळी केला.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या गटात काय होतय हे मला माहित नाही, मला त्यात इंटरेस्ट नाही. पण, काल एक व्हिडीओ माझ्याकडे आला आहे. मी आरोप केलेला नाही, तुम्ही याबाबत भुजबळांना विचारा, भुजबळ यांच्या खात्यातील एक कॉनट्रॅक्टर म्हणतो की, गेली काही वर्षे काही ठराविक कॉनट्रॅक्टरच पुरवठ्याचं काम करत आहेत. त्यामुळे, यात भ्रष्टाचार होत असेल तर त्याची चौकशी करावी. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहे, मला अपेक्षा आहे की, मुख्यमंत्री सामान्य नागरिकांचा पैसा वाचवतील, अशाही यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version