Marathi e-Batmya

भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांना केली विनंती राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा

तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडीबरोबर संघर्षाच्या भूमिकेवर, तर कधी महाराष्ट्राची दैवत आणि महापुरूषांच्या विरोधात वक्तव्ये आणि राज्यातील सत्तांतरा दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेप्रश्नी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिका संशयास्पद राहिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटविण्याच्या प्रश्नी मुंबईत महामोर्चाही काढला. त्यानंतर जवळपास महिनाभरानंतर राज्यपाल कोश्यारी यांनीच आज पदमुक्त करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याची माहिती राजभवनाकडून जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये देण्यात आली.

राजभवनने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये राज्यपाल कोश्यारी म्हणाले, राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविला आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिल्याचेही राजभवनच्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

तसेच राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version