Marathi e-Batmya

उद्धव ठाकरे यांचा सवाल, गॅस टंचाई नाही म्हणता… मग रांगा कशासाठी?

राज्यात एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही असा दावा सरकार करत असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. या विरोधाभासावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गॅस टंचाई नाही म्हणता, तर मग लोक सिलिंडरसाठी रस्त्यावर रांगा का लावत आहेत?” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता महाराष्ट्रालाही बसू लागला आहे. नवी मुंबईपासून गडचिरोली, वाशिमपर्यंत अनेक जिल्ह्यांत घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी आहेत. गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे.

मुंबईत तर परिस्थिती अधिकच बिकट होत चालल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगत पुढे म्हणाले की, माझ्या माहितीनुसार मुंबईतील ३० ते ४० टक्के रेस्टॉरंट्स बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. सामान्य जनता होरपळत असताना जर मुख्यमंत्री ‘सगळं सुरळीत आहे’ असं सांगत असतील तर राज्याची अवस्था कठीण आहे, अशी उपरोधिक टीकाही केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, गॅसच्या दरवाढीचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेले गॅस निर्मितीचे प्रयोग करूनही परिस्थिती बदललेली नाही. मग गॅस महाग का होत आहे आणि टंचाई का निर्माण होत आहे, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणीही केली.

दुसरीकडे राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त असल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला.

Exit mobile version