दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावरून सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी आज एकच गदारोळ विधानसभा आणि विधान परिषदेत केला. तसेच या याचिकेत शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आल्याचे कारण पुढे करत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा अशी मागणी करत सत्ताधाऱ्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज बंद पाडले. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख तथा आदित्य ठाकरे यांचे पिताश्री उद्धव ठाकरे यांनी सताधाऱ्यांच्या गदारोळानंतर विधान भवन परिसरातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांच्या या वर्तणाबाबत आश्चर्य व्यक्त केले.
शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले की, दरवेळी अधिवेशन आले की, हा मुद्दा बाहेर काढला जातो. मागच्या दोन-तीन अधिवेशनात हा मुद्दा कसा आला नाही असा सवाल करत याचे मला आश्चर्य वाटले होते. दरवेळी हा मुद्दा काढला जातो यात नवीन काहीच नाही.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या चिता पेटत असताना त्याला कोण जबाबदार आहे, शेतकऱ्यांच्या माता-भगिनीटाहो फोडत आहेत. संतोष देशमुख प्रकरणाप्रमाणे अनेकांची हत्या झाली. त्यांची मुलं न्याय मागत आहेत. त्याबद्दल सरकारची भूमिका काय असा सवाल करत दिशा सालियनचे वकील काहीही सांगत असले तरी त्यांनी ते न्यायलयात सांगावे असेही यावेळी सांगितले.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानत म्हणाले की, आमच्या घराण्याच्या अनेक पिढ्या जनतेसमोर आहेत. आमचा यास प्रकरणाशी दूरदूर पर्यंत संबध नाही. पण राजकारण वाईट बाजूला न्यायचे असेल तर सर्वांचीच पंचायत होईल असा गर्भित इशारा देत कारण खोट्याचा आधार घेत असाल तर ते तुमच्यावरही उलटेल असा सूचक इशाराही यावेळी दिला.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब प्रकरणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने जी भूमिका मांडली. त्या भूमिकेवरून भाजपाला औरंगजेब कबरीवरील राजकारणावरून दिशा बदलावी लागली. त्यामुळे संघाने मांडलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे धन्यवाद असेही यावेळी सांगितले.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी विधानभवन, मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. pic.twitter.com/bBRBuhqnXQ
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 20, 2025
