Marathi e-Batmya

वर्षा गायकवाड यांची मागणी, ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करा

महाराष्ट्रात ख्रिश्चन विवाह निबंधक (Registrar) नसल्याने या समाजातील विवाह व विवाह संबंधित कामे खोळंबली आहेत. विवाद निबंधक नसल्यामुळे मुंबई विभागाला प्रशासकीय विलंबाचा सामना करावा लागत आहे. सरकारने तातडीने ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणतात की, महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या अंदाजे १२ लाख असून  या समाजाचे लोक प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वसई भागात वास्तव्यास आहेत. पूर्वी ख्रिश्चन विवाह निबंधक हे मंत्रालयातील राजपत्रित अधिकारी (Gazetted Officers) असत. परंतु सध्या मंत्रालयात कोणताही ख्रिश्चन राजपत्रित अधिकारी उपलब्ध नाही. यापूर्वी हे काम पुणे जिल्ह्यातील एका तहसीलदाराद्वारे पाहिले जात असे. विवाह निबंधकच नसल्याने नागरिकांना निबंधकाच्या भेटीची वाट पाहावी लागते तरी आपण या प्रश्नी लक्ष घालून ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करून या समाजाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी केली.

Exit mobile version