Marathi e-Batmya

देवेंद्र फडणवीस, सुनिल तटकरे यांना अचानक का होतेय त्यांच्या जातींची आठवण?

राज्याच्या राजकारणासह संपूर्ण देशभरात पक्ष कोणताही असेल पण, निवडणूकीच्या काळात त्या त्या राजकिय पक्षाकडून एखाद्याला उमेदवारी देताना त्या संबधित उमेदवाराची जात पाहिली जाते. तसेच त्या त्या मतदारसंघात उमेदवाराच्या जातीची लोकसंख्या आणि उमेदवाराची आर्थिक ताकद पाहुन पक्षाकडून निवडणूकीतील उमेदवारी दिली जाते. या मार्गाचा अवलंब जवळपास सर्वच पक्षाकडून केला जातो. त्यामुळे “जात नाही ती जात” असा वाक्यप्रचार आता रूढ नाही तर राजकारणातील अविभाज्य भाग बनत चालला आहे. परंतु पक्षाच्या पाठिंब्याच्या जीवावर राज्यात आणि दिल्ली दरबारी मिळालेल्या पाठिंब्याच्या आधारे स्वतःला नेते म्हणून स्थापित केलेल्या अन् झालेल्या राजकिय व्यक्तींकडून स्वतःच्या जातीचा आधार घेतला जात असल्याबाबत सर्वचस्तरातून आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.

साधारणतः आठवडाभरापूर्वी एका खाजगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी “कदाचीत मी ब्राम्हण असल्याने मला लक्ष्य केले” जात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यास आठ दिवसांचा कालावधी लोटत नाही तोच एकेकाळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांचे समर्थक सुनिल तटकरे यांनी आज नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना “मी शूद्र असल्यानेच सुप्रिया सुळे या टीका करत असल्या” चा आरोप केला.

वास्तविक पाहता माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पक्षाच्या दिल्लीश्वरांनी मिळालेल्या पाठिंब्याच्या आधारावर उभ्या महाराष्ट्राचे नेते म्हणून स्थापित होऊ शकले. त्यानंतर राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती असो वा हिंदू समुदायाचे सण-उत्सव असो समर्थक आमदार आणि कार्यकर्त्यांसोबत मिसळून आनंद लुटण्याचा प्रसंग असो असा कोणतीच संधी देवेंद्र फडणवीस यांनी सोडली नाही.

तीच परिस्थिती अजित पवार समर्थक सुनिल तटकरे यांची पूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसबरोबर सत्तेत सहभागी होताना किंवा त्यानंतर मुलीला राजकारणात आणल्यानंतर तीची राज्याच्या मंत्रिमंडळात थेट राज्यमंत्री तर कधी कँबिनेट मंत्री म्हणून वर्णी लावण्यासाठी टाकलेल्या शब्दाला या दोन्ही नेत्यांनी सुनिल तटकरे यांचा शब्द कधी खालू पडू दिला नाही. मात्र त्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात सवता सुभा मांडल्यानंतर त्या नेत्यांच्या विरोधात मी शुद्र म्हणूनच सुप्रिया सुळे या टीका करतात असा आरोप करणे कितपत योग्य आहे. वास्तविक पाहता मराठा समाज आणि कोकणातील कुणबी समाज हा हिंदू धर्माच्या चार वर्णाश्रम व्यवस्थेत शुद्रच मानला गेलेला आहे. त्याचे संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी who were shudras? आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकात सविस्तर संदर्भ दिलेले आहेत. त्यास अद्याप पर्यंत तरी खुलासे वार उत्तर कोणीही दिलेले नाही.

मात्र सध्याच्या राजकिय परिस्थितीत भाजपा आणि त्या पक्षाचे नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजकिय प्रचारसभांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांवर (त्यात शरद पवार यांचा पक्षही आला) धार्मिक आणि जातीय राजकारण करत असल्याचा आरोप सातत्याने करत आले. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षणाचा आंदोलनामुळे अचानक देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या जातीची आठवण कशी झाली असा सवालही भाजपामधीलच नेत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांना अचानक आपण शुद्र असल्याची जाणीव व्हावी यावरूनही राजकिय अभ्यासकांकडून सवाल उपस्थित करत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये धार्मिक नव्हे तर जातीय समीकरणे प्रचाराच्या मध्यभागी असतील अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

Exit mobile version