संसदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेत सुरुवातीलाच केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भारत-पाकिस्तान तणाव आणि सरकारने या ऑपरेशन सिंदूरला कसे हाताळले यावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही देशांमधील युद्धबंदीसाठी मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार केलेल्या दाव्यांचे जाहीरपणे खंडन करण्याचे आणि त्यांना खोटे बोलत असल्याचे जाहिरपणे सांगावे असे आव्हान दिले.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी २९ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हटले आहे. जर पंतप्रधानांमध्ये इंदिरा गांधींच्या ५० टक्केही धाडस असेल तर त्यांनी संसदेत उभे राहून म्हणावे की ‘डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत, त्यांनी कधीही युद्धबंदीमध्ये मध्यस्थी केली नाही, असे आव्हानही यावेळी पंतप्रधान मोदी यांना दिले.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जर त्यांच्यात हिंमत असेल तर ते इथेच म्हणतील की डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत, असे उपहासात्मकपणे सांगितले आणि मोदींना सभागृहात ट्रम्पला “खोटे” म्हणण्याचे आव्हान दिले. पंतप्रधान गप्प का आहेत? जर ट्रम्प खोटे बोलत असतील तर ते सांगा. संसदेत सांगा असे आव्हानही यावेळी दिले.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवत आरोप केला की, ऑपरेशन सिंदूरनंतर वाढलेल्या सीमेवरील तणावादरम्यान, पाकिस्तानने भारताकडून आत्मसमर्पण करण्याची मागणी केली आणि ते फक्त ३० मिनिटांतच देण्यात आले.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारत सरकारने पाकिस्तान सरकारला कळवले की, आमच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नाही, आम्हाला लढायचे नाही. आम्ही फक्त ही कारवाई केली. आत्मसमर्पण करण्याची मागणी करण्यात आली होती, ३० मिनिटांत त्वरित आत्मसमर्पण करावे असा गंभीर आरोपही यावेळी केला.
इंडोनेशियातील भारताचे संरक्षण अटॅच कॅप्टन शिवकुमार यांचे म्हणणे उद्धृत करताना राहुल गांधी म्हणाले, भारताने गमावलेल्या विमानांच्या संख्येशी मी पूर्णपणे सहमत नसलो तरी, आम्ही काही गमावले. आणि हे केवळ राजकीय नेतृत्वाने लष्कराला पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणाली किंवा लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करू नये असे स्पष्टपणे निर्देश दिल्याने घडले. दुसऱ्या शब्दांत, आम्ही हल्ला केला पण आमच्या वैमानिकांचे हात बांधले अशी खोचक टीकाही यावेळी केली.
राजनाथ सिंह यांच्या भाषणातील वक्तव्यांचा पुर्नरूच्चार करत राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर पहाटे १:०५ वाजता सुरू झाले. त्यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर २२ मिनिटे चालले. नंतर त्यांनी सर्वात धक्कादायक गोष्ट सांगितली – १:३५ वाजता, आम्ही पाकिस्तानला फोन करून सांगितले की आम्ही गैर-लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला आहे आणि आम्हाला वाढ नको आहे…कदाचित त्यांना त्यांनी काय उघड केले ते समजत नसेल असा आरोपही यावेळी केला.
LIVE: Debate on Operation Sindoor | Parliament Monsoon Session https://t.co/6YfjuM9L30
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 29, 2025
राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच भारताच्या डीजीएमओना रात्री १:३५ वाजता युद्धबंदीची विनंती करण्यास भारत सरकारने सांगितले होते…तुम्ही थेट पाकिस्तानला तुमची राजकीय इच्छाशक्ती सांगितली होती, की तुमच्याकडे लढण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही, की तुम्हाला लढायचे नाही…,” अशी टीकाही यावेळी केली.
तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना म्हणाले की, आम्हाला अशा पंतप्रधानाची गरज नाही ज्याच्यात डोनाल्ड ट्रम्प खोटे आहेत असे म्हणण्याची हिंमत नाही. राष्ट्रपती ट्रम्प यांना तुम्हाला सांगू देऊ नका की मी युद्ध थांबवले, असा खोचक टोलाही यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला.
