राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीचा चांगलाच ज्वर वाढला आहे. त्यातच या निवडणूकीच्या निमित्ताने मुंबईसह महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे २० वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्रित आले. तसेच मनसे-शिवसेना उबाठाच्यावतीने नुकतेच प्रचाराच्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्क येथे जाहिर सभा झाली. नेमक्या याच कालावधीत मुंबईच्या महापौर पदावरून मराठी-अमराठीचा वाद सुरु झालेला असतानाच भाजपाचे तामीळ नेते अण्णामलाई हे मुंबईत भाजपाच्या प्रचारासाठी मुंबईत आले आणि म्हणाले की, मुंबई शहर महाराष्ट्राचे नाही तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून नव्या विषयाचा तोंड फुटले.
यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा उद्धव ठाकरे यांनी अण्णामलाईच्या वक्तव्यावरून भाजपावर जोरदार टीका केली. ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर अण्णामलाई यांनी पुन्हा ठाकरे बंधूंना खुलं आव्हान देत म्हणाले की, मी मुंबईत येतोय माझे पाय छाटून दाखवा.
प्रसार माध्यमांशी बोलताना अण्णामलाई म्हणाले की, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे कोण आहेत जे मला धमकवतात मला शेतकऱ्यांचा मुलगा असल्याचा अभिमान आहे. त्यांनी मला फक्त शिवीगाळ करण्यासाठी बैठका आयोजित केल्या आहेत. मला माहित नाही की मी इतका महत्वाचा का झालो आहे. काही लोकांनी लिहिलं की जर मी मुंबईत आलो तर ते माझे पाय छाटतील मी मुंबईला येत आहे. माझे पाय छाटून दाखवा. जर मला अशा धमक्यांची भिती असती तर मी माझ्या गावातच राहिलो असतो असेही यावेळी सांगितले.
यावरून शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे यावर काय म्हणणे असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, सुर्य -चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही. गर्जना चांगली असली तरी तुमच्याच पक्षाचे पुढारी मुंबईत येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असे सांगत आहेत. यावर त्यांनी उत्तर दिले पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची नाही हे भाजपाचे स्टार प्रचारकच जर सांगत असतील तर त्यांच्याविरोधात राज्यात गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजधानी विषयी ते असं विधान कसं करू शकतात, १०६ हुतात्म्यांचा हा अवमान भाजपाच्या अण्णामलाई यांनी केला असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे कुठे आहे तुमचा स्वाभामानी बाणा असा खोचक सवालही यावेळी केला.
