लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. राहुल गांधी यांची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेऊन भाजपानेही त्याची क़ॉपी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे आपणही जेन-झी बरोबर संवाद साधू या भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात कार्यक्रम घेतला पण तो सुपरफ्लॉप ठरला. फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांच्या जेन-झी संवाद कार्यक्रमावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राहुल गांधी हे समाजातील सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. भारत जोडो यात्रा ही त्याचाच एक भाग होती. सध्या विद्यार्थ्यांचा, शिक्षणाचा मुद्दा घेऊन ते छात्रों की गुंज हा कार्यक्रम करत आहेत. राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम राजकीय नसून फक्त तरुणाईशी संवाद साधण्याचा, त्यांचे विचार, दुःख, प्रश्न जाणून घेण्यासाठी हे व्यासपीठ आहे. तरुणवर्गाचा या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच आपणही कार्यक्रम करु असे ठरवून त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांचा वापर केला पण जेन झी ने त्याकडे पाठ फिरवली. नक्कल करायलाही अक्कल लागते, असा टोला लगावला.
हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीस व त्यांचे बगलबच्चे कार्यक्रमाआधी व नंतरही तोंडसुख घेत आहेत पण मुलींनी त्यांचे थोबाड बंद केलेले आहे, आता ते उसने अवसान आणून राहुल गांधी यांना महिला विरोधी असल्याचे दाखवू पहात आहेत. राहुल गांधी महिला सक्षमीकरणावर बोलतात पण महिला आरक्षणाला विरोध करतात, असा खोटा आरोप करत आहेत. महिला आरक्षणाचा पहिला निर्णय काँग्रेस सरकारनेच घेतला व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू केले त्याचा लाभ देशातील लाखो महिला घेत आहेत. संसदेत २०२३ सालीच महिला आरक्षण एकमताने मंजूर झालेले आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दल आनंदोत्सव साजरा करून ट्विटही केलेले आहे, त्याची अमंलबजावणी मोदी सरकारने अद्याप केलेली नाही. मग आता कोणत्या महिला आरक्षणाबदद्ल ते बोलत आहेत. खोटे बोलून दिशाभूल करण्याचा भाजपा व फडणवीस यांचा हा डावही जनतेने ओळखला आहे, जनता त्यांच्या खोटारडेपणाला थारा देणार नाही, असेही म्हणाले.
