चंद्रपुरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाकडे ३१ सदस्य आहेत. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील पक्ष असल्याने काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता पण त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर एमआयएमने तटस्थ राहून भाजपला मदत केली. आमचा नवा मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिल्याने भाजपाचा उमेदवार १ मताने विजयी झाला. शिवसेना (उबाठा) ने चंद्रपुरात जी भूमिका घेतली त्याचे परिणाम राज्यात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. परभणीत काँग्रेस पक्षाने अशीच भूमिका घ्यायची का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
चंद्रपूर महापौर निवडणुकीसंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व एमआयएमची अदृष्य युती आहे याचा अंजनगाव सुर्जी, अकोट, अचलपूर नंतर चंद्रपुरातही प्रत्यय आला आहे. चंद्रपूर महापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहून एमआयएमने भाजपाला मदतच केली आहे, भाजपा व एमआयएम एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यांनी काँग्रेसला मदत केली असती तर काँग्रेसचा महापौर झाला असता. काँग्रेसचा महापौर बनवण्यासाठी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभाताई धानोरकर या नेत्यांना एकत्र बसवण्याचा प्रयत्न केला व त्यांनी एकत्र येऊन कामही केले, काँग्रेसमध्ये कोणतीच फाटाफुट झालेली नाही. या निवडणुकीचा अहवाल पक्ष निरिक्षकांकडून मागवण्यात येईल व नंतर त्यावर सखोल चर्चा केली जाईल असे सांगितले.
