Marathi e-Batmya

अमित शाह यांच्याबद्दलच्या विधानाबद्दल शरद पवारांनी माफी मागावी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयाने तडीपार केले होते,अशी टिप्पण्णी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच केली होती. त्याबाबत बोलताना पियुष गोयल यांनी अमित शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषमुक्त ठरवले होते, याकडे लक्ष वेधले. अमित शाह यांना गुंतविण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले होते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. त्यावेळी शरद पवार सहभागी असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार केंद्रातील सत्तेत होते. त्यावेळच्या युपीए सरकारने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून अमित शाह यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना निर्दोष ठरविल्यामुळे शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज केली.

दरम्यान पुढे बोलताना पियुष गोयल म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला नसून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या वाढवण बंदरासाठी ७६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे . रेल्वे खात्यासाठीच्या तरतुदीत महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने वाटचाल सुरु झाली असल्याचे सांगितले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते अभिषेक मिश्रा, ओमप्रकाश चौहान आदी यावेळी उपस्थित होते.

पियुष गोयल पुढे बोलताना म्हणाले की, देशभरात १२ इंडस्ट्रियल पार्क उभारले जाणार आहेत त्यात राज्यातील दिघी येथे उभ्या राहणाऱ्या इंडस्ट्रिअल पार्कचाही समावेश आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी ११ लाख कोटी एवढी विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. याचाही फायदा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Exit mobile version