Marathi e-Batmya

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पलटवार, देशात तेव्हा इलेक्टड नव्हे तर सिलेक्टड सरकार…

राज्यघटनेच्या स्विकृतीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात काँग्रेसचे नेत्या प्रियंका गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपाने केलेल्या राजकिय चुकांवर भाष्य करत लोकशाहीचा ढाचा प्रयत्न भाजपावर हल्लाबोल केला. तसेच विरोधी बाकावरील इतर नेत्यांनीही भाषण करत राज्यघटना आणि देशातील सत्ताधारी भाजपाच्या कारभारावर ताशेरे ओढले. या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांच्या भाषणातील मुद्यांवर बोलताना काँग्रेसवर पलटवार करत देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशात इलेक्टेड नव्हे तर सिलेक्टेड सरकार होतं अशी टीका काँग्रेसवर केली.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या एका कुटुंबानं राज्यघटनेला इजा पोहोचविण्याची एकही संधी सोडली नाही.५५ वर्षे एकाच कुटुंबानं राज्य केलं. त्यामुळे देशात काय झालं हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. या कुटुंबाचे कुनिती, कुरिती, कुविचार यांची परंपरा निरंतर सुरु आहे. प्रत्येक स्तरावर राज्यघटनेला आव्हान दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले, १९४७ साली ते १९५२ साली देशात निवडणूका झाल्या नव्हत्या. त्यामुळे त्यावेळचं सरकार इलेक्टेड नव्हे तर सिलेक्टेड होतं. अंतरिम सरकारच्या रूपाने १९२ साली राज्यसभेचंही गठन झालं नव्हते. जनतेचा कोणताही आदेश नव्हता. त्यावेळी संविधान मंथन करून संविधान तयार करण्यात आलं होतं. संविधान तयार झाल्यानंतर एक ऑर्डिनन्स तयार करून संविधान बदललं गेलं होतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला होता. हा संविधान निर्मात्यांचाही अपमान होता. त्यांना जशी संधी मिळाली त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हातोडा मारला. आपल्या मनाप्रमाणे संविधान सभेत करू शकले नाहीत. ते त्यांनी मागच्या दाराने केलं. ते निवडूण आलेल्या सरकारचे प्रतिनिधी नसतानाही हे पाप केल्याचा आरोप यावेळी केला.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळी देशातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. जर संविधान आपल्या मार्गात येत असेल तर राज्यघटनेत कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन करू असं पत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिल्याची आठवणही यावेळी करून देत काँग्रेसवर हल्लाबोल केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पण देश शांत नव्हता. त्याकाळी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी इशारा दिला की, पंडितजींचं चुकतंय, आचार्य कृपलानी, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या नेत्यांनी पंडित नेहरूंना थांबविण्यासाठी सांगितलं. पण स्वतंत्र राज्यघटना चालत नव्हती. त्यांनी वरिष्ठांचा सल्ला ऐकला नसल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना इंदिरा गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ६ दशकात ७५ वेळा संविधान बदलले गेले. जे बिज देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी रोवले त्या बीजाला खतपाणी घालण्याचे काम आणखी एका पंतप्रधानांनी केलं. त्याचं नाव होतं इंदिरा गांधी, १९७१ साली सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला त्या निर्णयामुळे राज्यघटना बदलली गेली. देशाच्या न्यायालयाचे पंख त्यांनी कापून टाकले. संसद राज्यघटनेच्या कोणत्याही कलमात काहीही करू शकते. त्याकडे न्यायालय पाहू ही शकत नाही अशी ती तरतूद होती असा आरोप करत न्यायालयाचे अधिकार काढून टाकले होते. हे पाप इंदिरा गांधी यांनी केले होते अशी टीकाही यावेळी केली.

Exit mobile version