Marathi e-Batmya

संजय निरूपम यांची मागणी,…राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. याबाबत आक्रमक होत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय निरुपम बोलत होते.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे रविंद्र वायकर ४८ मतांनी विजय झाला. मात्र विरोधकांनी या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत उत्तरे दिली.

संजय निरूपम पुढे बोलताना म्हणाले की, इंडिया आघाडीतील सर्वच नेत्यांनी वृत्तपत्रातील खोटी बातमी पोस्ट केली. त्या सर्वांनी माफी मागायला हवी. जर वृत्तपत्राने माफी मागितली आहे तर आदित्य ठाकरेंनीही माफी मागायला हवी. निवडणूक आयोगाकडून पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पाडत असताना एका वृत्तपत्राच्या खोट्या बातमीचा आधार घेत निवडणूक आयोगाच्या निकालावर चुकीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागायला हवी, अशी मागणीही यावेळी केली.

ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असा दावा संजय निरुपम यांनी करत जर ईव्हीएम हॅक होऊ शकते मग काँग्रेसच्या इतक्या जागा निवडून आल्या असत्या का? असा सवाल उपस्थित उपस्थित करत सुमारे एक लाख मतांची मोजणी शिल्लक असताना उबाठा गटाचे अमोल किर्तीकर विजयी झाले अशी बातमी संध्याकाळी ५.४० वाजता कशी व्हायरल होते? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना संजय निरूपम म्हणाले की, मतमोजणीवेळी तिथे मोबाईल घेऊन जाणाऱ्या विरोधात वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार निवडणूक अधिकारी यांनी केली आहे. त्याबाबत चौकशी व कारवाई व्हावी. शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न उबाठाकडून केला जात आहे. खोट्या बातमीमुळे पोलिस, निवडणूक अधिकारी यांना बदनाम केले गेले. आमच्या पक्षाचीही बदनामी झाल्याचे सांगितले.

सामाना आणि रश्मी ठाकरे यांनी माफी मागावी

सामनात आज पुन्हा एक खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली. सामानाच्या संपादक रश्मी ठाकरे आहेत. यांसदर्भात सामनाने जाहीर माफी मागितली नाही, तर प्रेस कॉन्सिलकडे दाद मागू, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला.मातोश्री २ ही फेक नरेटिव्हची फॅक्ट्री आहे आणि त्याचे कारकून संजय राऊत आहेत, अशी टीकाही संजय निरुपम यांनी केली.

Exit mobile version