नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा पक्षाची सर्वाधिक चर्चा होती. मात्र लोकसभा निवडणूकीच्या काळात शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात सर्वाधिक जास्त लक्ष्य केंद्रीत केले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारात आणि शिवसेना उबाठाच्या उमेदवारापैकी कोण जिंकणार याबाबत उत्सुकता होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा संभाजीनगरमधून विजय झाला. इतर ठिकाणी मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठवाड्यावर लक्ष्य केंद्रीय केले आहे.
संभाजीनगर येथील शिवसेना उबाठाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मोदी-शाह यांच्यात हिंमत नाही, मला घरी बसविण्याची. पण तुम्ही जोपर्यंत लढ म्हणताय तो पर्यंत मी लढत राहणार ते जिंकण्यासाठी. पण तुम्ही अर्थात जनता जेव्हा ठरवेल त्या दिवशी मी घरी बसेन असेही यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ही निवडणूक महाराष्ट्र प्रेमी विरूद्ध महाराष्ट्र द्रोही यांच्यात होत आहे. लोकसभेत दुर्दैवान पराभव झाला. तो कसा झाला आणि का झाला, याते उत्तर कोण देणार असा सवाल करत महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात प्रामाणिकपणे केलेला कारभार तुम्हाला पसंत पडला नाही का, की माझे नेतृत्व तुम्हाला पसंत नाही का असा सवाल करत नसेल तर नाही म्हणून सांगा. मला मोदी शाह घरी बसवू शकत नाहीत. ज्या दिवशी सांगाल त्या दिवशी क्षणार्धात घरी बसेन, पण जोपर्यंत तुम्ही लढण्यास सांगत आहात. तोपर्यंत वाटेत कुणीही आलं, जीव गेला तरी बेहत्तर पण जिंकून दाखविल्याशिवाय राहणार नाही असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.
२०१९ च्या विधानभा निवडणूकीच्या वेळी शिवसेनेने कन्नडमधून उदयसिंग राजपूत, सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, संभाजीनगर मध्यमधून प्रदीप जैस्वाल, संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाट, पैठणमधून संदीपान भुमरे, आणि वैजापूरातून रमेश बोरनाळे यांचा विजय झाला होता. मात्र कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत वगळता बाकीचे पाचही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. यावेळी मात्र शिवसेना उबाठाच्या उमेदवारा विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेही उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या पाचही मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाचे उमेदवार निवडूण येणार याचा निर्णय २३ नोव्हेंबर रोजीच सर्वांसमोर येणार आहे.
