Marathi e-Batmya

उद्धव ठाकरे यांचा सवाल, मॉरिसने स्वतःवर गोळी मारून घेतली की कोणी मारली?

महाराष्ट्र आणि मुंबईत सलग झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी राजकिय आणि सामाजिक वातावरण चांगलेच हादरून गेलेले आहे. त्यातच शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुंड मॉरिस याने समेटाच्या निमित्ताने त्याच्या कार्यालयात बोलावून गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बाहेर आले. यावरून अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस यांने गोळीबार केल्याची माहिती पोलिस आणि प्रसारमाध्यमांमधून पुढे आली. मात्र या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजच्या उपलब्धतेवर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करत सेट प्रसारीत करण्यात आलेल्या गोष्टींवरच कथानकावर संशय व्यक्त केला.

आज मातोश्री या वांद्रे येथील निवासस्थानी शिवसेना उबाठा उद्धव ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोऱ्होनो याने गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासंदर्भात फेसबुक लाईव्हच्या वेळच्या व्हिडीओ फुटेजचा संदर्भ दिला जातो. परंतु ते अर्धवट फुटेज फक्त बाहेर आले असून त्या व्यक्तीरिक्त असलेल्या सीसीटीव्ही फुटेज बाहेर का आणले जात नाही. अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस गोळीबार करत असल्याचे अर्धवट फुटेज पुढे आणण्यात का आले नाही असा सवाल करत एखाद्या व्यक्तीवर दुसऱ्या एका व्यक्तीने जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्यानंतर गोळीबार करणारा व्यक्ती स्वतः आत्महत्या का करेल असा सवालही उपस्थित केला.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, त्या हॉटेलमध्ये, कार्यालयात असलेले दुसऱ्या सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर आले पाहिजेत. घोसाळकर यांच्यावर मॉरिसने गोळीबार करताना त्यांच्यासोबत दुसरे कोणी होते का असा दुसरा सवालही उपस्थित करत घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली रिव्हॉलर त्यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाची असे पोलिसांकडून सांगण्यात येते. मग त्याला खाजगी सुरक्षा रक्षक ठेवण्याची वेळ का यावी, जर म़ॉरिसने त्यावेळी गोळीबार केला असेल तर जो व्यक्ती आधीच तुरुंगात राहुन आला आहे त्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याला संपविल्यानंतर तुरुंगाची भीती वाटली असेल असे वाटत नाही. त्यामुळे मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली असेल म्हणणे योग्य ठरणार नाही. तसेच त्याला तसे करताना कोणी पाहिले का की त्याच्या सोबत आणखी कोणी होता आणि त्यानेच घोसाळकर आणि म़ॉरिसवर गोळीबार करत संपविले असा सवाल करत ते ही अर्धवट सीसीटीव्ही फुटेज बाहेर यायला हवे अशी मागणीही केली.

यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला की अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्या वाद होता. तसेच दोघांमध्ये राजकिय स्पर्धा निर्माण झाली होती. तसेच मॉरिस याला बलात्काराच्या घटनेत तुरुंगवासाची शिक्षा होण्यास अभिषेक घोसाळकर हे कारणीभूत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, जी काही माहिती पुढे आणण्यात येत आहे ती सगळी झुट आहे. त्यामुळे मॉरिस आणि अभिषेक यांच्यात राजकिय स्पर्धा निर्माण झाल्याने ही घटना घडली असे मी मुळीच म्हणणार नाही. कारण बाहेर आलेले सीसीटीव्हीचे फुटेज अर्धेच बाहेर आल्याचा मुद्दा पुन्हा सांगत केवळ नगरसेवक पदाच्या निवडणूकीच्या कारणामुळे अशा पध्दतीची स्पर्धा होणे हे योग्य वाटत नसल्याचे सांगत राहिलेले अर्धवट सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणावेत अशी मागणीही पुन्हा केली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात बसून केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज कोणीही न मागताच पुढे आणले गेले. कारण ते त्यांच्या सोयीचे होते. परंतु गोळीबाराच्या घटनेनंतर गणपत पाटील यांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर आणि त्यांच्या सुपुत्रावर करोडो पैसे खाल्याचा आरोप केला. हे करोडो पैसे कोठून आले असा सवाल करत त्याची चौकशी राज्याचे गृहमंत्री करणार की नाही असा सवाल यावेळी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्याला मिळालेला मनोरूग्ण गृहमंत्रीः उद्धव ठाकरे

यावेळी देवेंद्र फडणवीस शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनाम्याची मागणी करतील असे खोचक प्रत्युत्तर दिले. त्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोरूग्ण झाले आहेत. त्यामुळे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या आर्शिवादाने सध्या राज्यात गुंडगिरी फोफावत आहे. तसेच गुंडाना पोसले जात आहे, त्यासंदर्भातील नवनवे फोटो बाहेर येत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याबाबत चकार शब्द बोलत नाहीत. उलट राजकिय विरोधकांवर कमकुवत करण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यातच विरोधकांच्या व्यक्तीची हत्या केली की फडणवीस यांना त्याची कुत्र्याबरोबर करायची सुबुद्धी सुचते यावरूनच ते किती मनोरूग्ण झालेत याची प्रचिती येते अशी खोचक टीकाही केली.

Exit mobile version