Marathi e-Batmya

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, पुछता है भारत म्हणणाऱ्यांना देश आता पुसून टाकतोय

लोकसभा निवडणूकीनंतर शिवसेना उबाठा गटाने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला होता. यावेळी उद्धव ठाकरे हे आपल्या पुढील वाटचालीसंदर्भात काय बोलणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावरही जोरदार टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, आज मी विजयी उमेदवारांबरोबरच निवडणूकीत हरलेल्या उमेदवारांचाही सत्कार केला. कारण ते निष्ठावान लढवय्ये असून लोकसभा निवडणूकीत जरी त्यांचा पराभव झालेला असला तरी देशात मध्यावधी निवडणूका लागण्याची शक्यता असून त्या निवडणूकीत ते पुन्हा निवडूण येणार आहेत. त्यामुळेच या लढवय्या सैनिक उमेदवारांचा मी सत्कार केला आहे. मध्यंतरी काही जण आपल्या शिवसेनेला संपवायला निघाले होते. आज तेच विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आपल्या विषयी गैरसमज पसरविण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार एनडीए सोबत अशी बातम्या पेरत आहेत. छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्या अफवा पसरवत आहेत अशी टीकाही भाजपावर केली.

यावेळी उपस्थित जनसमुदायालाच उद्घव ठाकरे यांनी आपण एनडीए सोबत जायचा का, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांसोबत जायचं का असा सवाल केला तेव्हा जनसमुदायाने नाही असे उत्तर देत आज पुछता है भारत असा नारा देत देशातील विरोधकांवर तपास यंत्रणांच्या माध्यमातून वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यांनाच आज देश पुसून टाकत असल्याची खोचक टीकाही यावेळी केली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, होय मला इथल्या महाराष्ट्रातील मराठी, हिंदू, ख्रिश्चन, दलित, बौध्द समाजासह मुस्लिम समाजानेही मला मते दिली. मी ते कधीही नाकारणार नाही. पण भाजपाचे नाव न घेता तुमच्यासारखे मते मिळवूनही न मिळाल्याचे सांगत नाही. पंतप्रधान पदासाठी मोदींनी चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे नितीशकुमार यांच्याशी युती केली. चंद्राबाबू नायडू यांनी तर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती, तशीच नितीशकुमार यांनीही बिहारमधील मुस्लिम समाजाला काही आश्वासने दिली असतील. मग तुम्हीही या दोघांचा पाठिंबा घेताना त्यांना विचारले नाही का, की तुम्ही त्याबाबत काही आश्वासनही दिले नाही, तुम्ही मुस्लिम मतांबद्दल मग माझ्या मिळणाऱ्या मुस्लिम मतांबाबत तुम्हाला का प्रश्न पडतात असा सवालही यावेळी केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान देत म्हणाले की, पंतप्रधान मोदीजी विधानसभा निवडणूकीचा प्रचार तुम्ही आतापासून सुरुवात करा, जर तुम्हाला जर खरेच वाटत असेल येत्या विधानसभा निवडणूकीत गद्दारांना बाजूला सारून आणि माझ्या वडीलांचा फोटो न लावता थेट आमच्यासोबत लढा मग तुम्ही आणि मी मग बघु महाराष्ट्रातील जनता देशभक्ताला मतदान करते की, रामाच्या नावाखाली हुकूमशाही कारभार करते त्याला मतदान करते असे आव्हानही यावेळी दिले.

तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटालाही यावेळी आव्हान देत म्हणाले की, जर तुम्ही खरे मर्द असाल तर माझ्या वडीलांचा फोटो न लावता तुम्ही नरेंद्र मोदीचा नाही तर तुम्ही तुमच्या बापाचा फोटा लावून निवडणूका लढवून दाखवा असे सांगत जर तुम्ही माझ्या वडीलांचा फोटो लावलात तर तुम्ही षंढ आहात असे आम्ही म्हणू असा उपरोधिक टोलाही यावेळी भाजपा आणि शिंदे गटाला लगावला.

Exit mobile version