Marathi e-Batmya

उद्धव ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल, प्रियांका गांधी यांनी भाजपाच्या घशात दात घातले…

काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दोन चांगले शब्द वदवून दाखवावे असे आव्हान दिले. भाजपाने दिलेल्या आव्हानला काल प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर शरसंधान करत हल्लाबोल केला.
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची सभा आज पाटण मध्ये झाली. त्यावेळी तेथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल करत त्यांना सोडून गेलेल्या आमदारांवरही यावेळी टीका केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल परवा पंतप्रधान मोदी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रचार दौऱ्यावर आले होते. त्यांनी आव्हान दिलं की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दोन चांगले शब्द राहुल गांधी यांच्याकडून वदवून घ्यावे. काल प्रियांका गांधी शिर्डीत आल्या होत्या. तेव्हा बाळासाहेबांबद्दल भरभरून बोलल्या, त्यांनीच भाजपाचे दात घशात घातले. खरं तर फोडा-झोडा आणि राज्य करा हीच भाजपाची नीती असल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपलं सरकार गद्दारी करून पाडण्यात आलं. कारण त्यांना महाराष्ट्र लुटायचा होता.मी तो लुटू देत नव्हतो, म्हणून त्यांनी शिवसेनेवर घाला घातला, मिंधेना कळत नाही, वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची नीती आहे. निवडणूकीच्या प्रचारात अमित शाह बोलले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याचा अर्थ एकच आता मिंधे गटाचा उपयोग संपला अशी टीकाही यावेळी केली.

उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना शंभुराज देसाई यांच्यावर टीका करताना म्हणाले की, पाटणमध्ये एक गद्दार आहे. तो राज्यातील मंत्री असून तो लुटमार मंत्री आहे. त्याने मंत्री असताना सरकारी पैशाचा वापर कसा केला, हे मला माहिती आहे. फक्त सत्ता येऊ द्या त्यानंतर यांची सगळी प्रकरण मार्गी लावतो असा इशाराही यावेळी देत याच गद्दारांने पाटणमध्ये उद्योग का आणले नाहीत असा सवाल करत ह्या लोकांना सगळं काही मी दिलं. तरीही मंत्री पदाचा गैरवापर करत गद्दारी केली. तिकडे सुरत मार्गे गुवाहाटीला गेल्याचेही यावेळी सांगितले.

Exit mobile version