Marathi e-Batmya

आशिष शेलार यांचा सवाल, ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा?

अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला आहे. कालपासून त्यांची व पिलावळांची वक्तव्य पाहतोय, हा बेशरमपणा आहे. अफजल गुरुची ‘बरसी’ करता तशी आता अक्षय शिंदेची पण ‘बरसी’ करणार का? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, विरोधकांची काय वक्तव्य आहेत? काय सांगत आहात? काय संदेश आहे? काय अर्थ काढायचा ? थोडा अभ्यास करून बोला. एवढा थयथयाट करताय? काय सांगायचे आहे तुम्हाला? असा सवाल करत
पोलिसांनी गोळ्या खायच्या काय? त्या पिडित बच्चूची मानसिकता तरी समजून घ्या. त्यांनी दिलेल्या पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात? त्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराबाबत, तो झाला की नाही? पोलिसांनी काही नाही केले? या सर्व गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहे काय? कुठल्या थराला गेला तुम्ही? याचे राजकारण करता की तो अक्षय शिंदे, गुन्हेगार तो लिंगपिसासू त्याची माळ हे जपत आहात? असा थेट सवाल करीत तो लिंगपिपासू आणि हे सत्तापिसासू, अशा शब्दांत टीका केली.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, शरद पवार साहेब तुम्ही काय बोलत आहात ? हलगर्जीपणा? आरोपीने पोलिसांवर हात टाकल्यावर काय त्यांनी भजन करायचे का? पोलिसांच्या बंदुकीला जो हात घालेल, त्याला ठोकायलाच पाहिजे. आम्ही पुर्णपणे पोलिसांच्या पाठीशी आहोत. उबाठा गट आता ज्या अधिकाऱ्यांनी आरोपीला ठोकले त्या अधिकाऱ्याला आता काय जोडे मारो करणार काय? असा खोचक सवाल ही केला.

महाविकास आघाडीला सवयच लागली आहे, आतंकवादी, गुन्हेगार असेल त्याला ठोकला की त्याचे फोटो घ्यायचे व गळा काढायचा. अफझल गुरुची ‘बरसी’ केलीत उद्या अक्षय शिंदेची ‘बरसी’ करतील अशी खोचक टीकाही यावेळी केली.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, कुठे आहेत उद्धव ठाकरे? त्या लिंगपिसासू विरोधात बोलताना का जीभ अडकत आहे यांची ? आदित्य ठाकरे आज ट्विट करीत आहेत. मग त्यांच्याकडे माहिती होती तर ते पोलिसांत का गेले नाहीत? त्यांनी हे कर्तव्य का नाही केले? नागरिक म्हणून चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून ते पोलिसांकडे का गेले नाहीत? विरोधकांवर शहरी नक्षलवादाचा प्रभाव आहे, त्यांच्यासाठी ईडी चुकीचे, पंतप्रधान व मुख्यमंत्रीपद चुकीचे, वातावरण असे निर्माण करायचे की या देशात कायदाच नाही अशी टीका केली.

शेवटी आशिष शेलार म्हणाले की, अक्षय शिंदेने बंदुक घेतली तर या पोलिसांनी काय करायचे होते? बरं ज्याला ठोकला तो कोण आहे ? चिमुरडीसोबत प्रकार केला त्या कुटुंबाची काय मानसिक अवस्था असेल? पोलीस आणि तपास यंत्रणासमोर त्यांची साक्ष झाली आहे. काही पुरावे गोळा केले गेलेत? आज ते सगळे खोटे ठरवताय? असा सवालही विरोधकांना केला.

Exit mobile version