तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आमदार रवि राणांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा १५ वर्षांनी त्यांना हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आठवलं

हनुमान चालिसावरू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिल्याप्रकरणी तब्बल १२ दिवस तुरुंगात घालविल्यानंतर बाहेर आलेले अमरावतीचे आमदार रवि राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला. १५ वर्षानंतर यांना मी रहात असलेली इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची टीका आमदार रवि राणा यांनी करत आता मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडून गावोगावी फिरलं पाहिजे असा उपरोधिक सल्लाही दिला.
ठाकरे सरकारने एका महिलेसोबत कशाप्रकारे वर्तन केले हे सर्वांनी पाहिलं आहे.
जे झालं ते देशातील सर्व रामभक्त आणि हनुमान भक्त पाहत होते. एका महिलेसोबत कशाप्रकारे वर्तन केलं जात होतं, कशाप्रकारे दबाव आणला जात होता हे सर्वांनी पाहिलं. महाराष्ट्रात एका महिलेला तुरुंगात वाईट वागणूक दिली. त्यांना सहा दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यावर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही. त्यांना कोणताही उपचार देण्यात आला नाही. आता नवनीत राणा खूप दुःखी आहेत. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचा सीटी स्कॅन झाला, दोन-तीन वेळा रक्तचाचणी झाल्याचे त्यांनी सांगितले.
मी आणि खासदार नवनीत राणा तुरुंगात असताना मला बीएमसी खारमधील आमच्या घरी वारंवार नोटीस देऊन कारवाई करू पाहत आहे. ही इमारत ज्या बिल्डरने बांधली त्याला १५ वर्षापूर्वी बीएमसीने परवानगी दिली होती. आता १५ वर्षांनी त्यांना हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आठवलं. आता द्वेषाची आणि सुडाची कारवाई केली जात आहे. ही राजकीय कारवाई आहे. त्यामुळे त्यांना जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी असंच मी सांगणार आहे. मी हवं ते सहकार्य करेल, पण महाराष्ट्रात काय सुरू आहे हे देशातील जनतेला माहिती असल्याचेही ते म्हणाले.
आमचा न्यायालयावर विश्वास आहे आणि सन्मान करतो. न्यायालयाने आम्हाला या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचं आम्ही पालन करणार आहे. मला वाटतं महाराष्ट्रात जे कृत्य सुरू आहे ते याआधी कधीही महाराष्ट्रात झालं नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची जनतेचा मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता होती. त्याची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला येत असल्याचेही ते म्हणाले.
त्याचबरोबर महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. तसेच या सरकारच्या मागील २ वर्षाच्या काळात महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ९० टक्के खोटं बियाणं दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
मागील २ वर्षात महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ९० टक्के खोटं बियाणं देण्यात आलं. मात्र, तरीही महाबीजवर कोणतीही कारवाई केलेली नाही. केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला खतं देण्यात आलेत. ते जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये पुरवले पाहिजे. महाराष्ट्रात नवे उद्योग आले पाहिजे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन आहे. महाराष्ट्रात औद्योगिक विकास थांबलाय आणि बेरोजगारी वाढल्याचा दावाही त्यांनी केला.
आता मुख्यमंत्र्यांनी बाहेर निघून राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात फिरलं पाहिजे असं म्हणत रवी राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांचा इशारा, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता न आल्यास बॅज निलंबित करणार २० ऑगस्टपासून नियमाची अंमलबजावणी

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून, या नियमाची अंमलबजावणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *