आशिष शेलार यांचे निर्देश, मिरजेत ‘म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारणीसाठी आराखडा तयार करा मिरजच्या संगीत वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग

देशातील ऐतिहासिक तंतुवाद्य निर्मिती परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरजच्या संगीत वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी मिरज येथे अत्याधुनिक ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, सांस्कृतिक कार्य विभाग, उद्योग विभाग आणि संबंधित संस्थांची संयुक्त बैठक तातडीने घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मंत्रालयात मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त आयुक्त बी. टी. यशवंते तसेच मिरज येथील तंतुवाद्य निर्माते व कारागीर उपस्थित होते.

आशिष शेलार म्हणाले की,  मिरजच्या दोनशे वर्षांहून अधिक जुन्या तंतुवाद्य निर्मिती परंपरेच्या जतनासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मिरज ही वैद्यकीय नगरीबरोबरच देशातील महत्त्वाची संगीतनगरी असून येथे सुमारे २०० कुटुंबे पारंपरिक हस्तकलेद्वारे सितार, तानपुरा, सुरबहार, दिलरुबा, मयुरी वीणा आदी तंतुवाद्यांची निर्मिती करतात. या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.

या प्रस्तावित प्रकल्पामध्ये आधुनिक तंतुवाद्य निर्मिती केंद्र, विशेष वाद्य संग्रहालय, प्रदर्शन दालन, परफॉर्मिंग आर्ट्स सेंटर, संगीत इतिहासाचे दस्तावेजीकरण, संशोधन सुविधा तसेच कलाकारांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि नियमित सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्था करण्याचा समावेश असावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, मिरजच्या समृद्ध संगीत परंपरेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा हा व्यापक सांस्कृतिक प्रकल्प ठरेल. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून संग्रहालय संकल्पना, वाद्य वारसा संवर्धन, महोत्सव आयोजन, संकल्पनात्मक आराखडा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. तर जमीन, निधी आणि आवश्यक पायाभूत सुविधांबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांच्या स्तरावर करण्यात यावे.

शेवटी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरात लवकर बैठक घेऊन प्रकल्पाचे सादरीकरण, जागेची उपलब्धता, निधीचे नियोजन आणि प्राथमिक आराखडा निश्चित करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. मिरजच्या समृद्ध संगीत परंपरेचे जतन करून तिला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहनही ॲड. शेलार यांनी यावेळी केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, NEET, TET नंतर MPSC चा पेपरही फुटला तीन वर्षांत महाराष्ट्रातील २८७६४ लघु व मध्यम उद्योग बंद, शिक्षणही बोंबलले आणि नोकऱ्याही गेल्या..

देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीचेच भविष्य अंधारात लोटण्याचे महापाप भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *