“राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज रक्कम २ लाखांपर्यंत आहे, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. ‘हेअरकट’मुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, संबंधित बँकांशी समन्वय साधून या सर्व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येत असल्याचे” कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. सरकारने कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात १६ लाख ९६ हजार पात्र खात्यांची यादी प्रसिद्ध केली असून दुसरी यादी पुढील काही दिवसात जाहीर होणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पुण्यात कृषी क्षेत्राशी संबंधित विषयांवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, ‘हेअरकट’ म्हणजे राज्य शासन आणि बँका यांच्यातील आर्थिक समझोता असून, कर्जमाफीमध्ये सरकार आणि बँकांनी किती रक्कम उचलायची याचे सूत्र आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांचे कर्ज कमी करणे असा नसून, सरकार आणि बँका यांच्यातील आर्थिक वाटा निश्चित करणे हा त्यामागील उद्देश आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील प्रत्यक्ष थकीत रक्कम आणि शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतील रक्कम यामध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात माझे संपूर्ण कर्ज माफ झाले का नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार असून, पात्र शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तसेच कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार असून दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणे शक्य होईल.
हेअरकट (राज्य शासन व बँका यांच्यातील समझोता)
हेअरकट टक्केवारी
• १ वर्षापर्यंत थकीत कर्ज – सरकारचा वाटा ८५%, बँक १५%
• २ वर्षे थकीत कर्ज – सरकारचा वाटा ७०% , बँक ३०%
• ३ वर्षे थकीत कर्ज – सरकारचा वाटा ५५% , बँक ४५%
• ४ वर्षे थकीत कर्ज – सरकारचा वाटा ४५% , बँक ५५%
• ४ वर्षांपेक्षा जास्त थकीत कर्ज – सरकारचा वाटा ३५%, बँक ६५%
पुढे बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील १६ लाख ९६ हजार शेतक-यांपैकी केवळ ३ लाख ३३ हजार ८७६ शेतक-यांचीच ईकेवायसी पूर्ण झाली आहे. त्यामुळे पात्र शेतक-यांनी लवकरात लवकर ईकेवायसी पूर्ण करावी असेही त्यांनी यावेळी बोलताना आवाहन केले.
यावेळी बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. सोयाबीनच्या निकृष्ट बोगस बियाण्यांच्या प्रकरणात ८५ कंपन्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले असून संबंधित कंपन्यांना बियाणे बदलून देण्याच्या व नुकसानभरपाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात यंदा ४५.१० लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली असून सुमारे २४ हजार हेक्टर क्षेत्रावरील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.
शेवटी बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, तसेच राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९४ टक्के पर्जन्यमान झाले असून ८४ टक्क्यांहून अधिक खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहितीही यावेळी बोलताना दिली.
Marathi e-Batmya