आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांची घोषणा, राज्यात असंसर्गजन्य रोग कार्यक्रम आशियायी विकास बॅंक आणि आशियायी पायाभूत सुविधा बॅंकेचे सहकार्य

राज्याच्या ग्रामीण भागात असंसर्गजन्य रोगांच्या निदानाची सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यात असंसर्गजन्य रोग कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण रुग्णालयात रोग निदान सुविधांसाठी आता आशियायी विकास बॅंक आणि आशियायी पायाभूत सुविधा बॅंकेचे सहकार्य राज्य शासनाला मिळणार आहे.

मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी राज्यात असंसर्गजन्य रोग कार्यक्रम राबविण्याचे प्रस्तावित केले होते, त्यानुषंगाने आरोग्य मंत्री प्रा.डॅा. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह आशियायी विकास बॅंकेचे प्रतिनिधी हून किम, आशियायी पायाभूत सुविधा बॅंकेच्या प्रतिनिधी जी सून सांग, डॅा. निशांत जैन, सॅबी आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, असंसर्गजन्य रोग कार्यक्रमाची चांगली संकल्पना राबविण्याची राज्य शासनाची तयारी सुरु आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी असंसर्गजन्य रोग निदानाची सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आशियायी विकास बॅंक आणि आशियायी पायाभूत सुविधा बॅंकेचे सहकार्य राज्य शासनाला मिळणार आहे. या सुविधेमुळे असंसर्गजन्य रोगांचे निदान करुन त्यांना प्राथमिक स्तरावरच प्रतिबंध करणे शक्य होईल. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात असंसर्गजन्य रोग निदानाची सुविधा निर्माण करण्यासाठी आशियायी विकास बॅंक, आशियायी पायाभूत सुविधा बॅंकेचे प्रतिनिधी आणि राज्य शासनाच्या प्रतिनिधींचा एक कार्यगट तयार करुन आराखडा तयार करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री डॅा.सावंत यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

कोरोना महामारीनंतर देशविदेशात मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यासारख्या असंसर्गजन्य रोगांमुळे रुग्ण मृत्युदर वाढला आहे. लसीकरणानंतर कोरोनामुळे रुग्ण दगावण्याचा दर कमी झाला आहे. मात्र, तद्नंतर असंसर्गजन्य रोगग्रस्त रुग्णांमध्ये वाढ झाली असून मृत्यूदरही वाढला आहे. यात विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठी आहे. यामध्ये ग्रामीण महिलांना विविध कर्करोगांना सामोरे जावे लागत आहे. राज्यात ग्रामीण रुग्णालयांची यंत्रणा कार्यरत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना देखील सुरु आहेत.मात्र, या ग्रामीण रुग्णालयांमध्ये असंसर्गजन्य रोग निदान सुविधा अपुरी आहे. त्यामुळे असंसर्गजन्य रोगांचे वेळीच आणि स्थानिक पातळीवरच निदान होण्यासाठी रोग निदान सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यात असंसर्गजन्य रोग कार्यक्रम राबविण्याची संकल्पना मांडली असल्याचे ‘मित्र’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाविषयी झालेल्या चर्चेदरम्यान दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित आशियाई विकास बॅंकेचे प्रतिनिधी हून किम, आशियायी पायाभूत सुविधा बॅंकेच्या प्रतिनिधी जी सून सांग, डॉ. जैन, सॅबी यांनी राज्य शासनाचा असंसर्गजन्य रोग कार्यक्रम स्तुत्य असल्याचे सांगून हा कार्यक्रम राबविण्यास संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, पदभरती, पदोन्नतीला गती द्या पदोन्नतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेश

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *