वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात २५ जुलै रोजी मुंबई चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात झाली. त्या यात्रेची सांगता औरंगाबाद येथे ७ ऑगस्ट रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात ५५ लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणार अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले. औरंगाबाद शहरातील आमखास मैदान येथे दुपारी १२.०० वाजता आरक्षण बचाव यात्रेचा समारोप कार्यक्रम होणार आहे.
२५ जुलै रोजी मुंबई चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रा निघाली ही यात्रा राज्यातील अनेक जिल्ह्यांतून प्रवास करत औरंगाबाद शहरात ७ ऑगस्ट रोजी दाखल होणार आहे. राज्यातील २२ जिल्हे आणि ३५० हुन अधिक गावात ही यात्रा निघाली होती. ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे, एससी- एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट व्हावी, ओबीसी विद्यार्थ्यांना एससी – एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती मिळावी, १०० ओबीसींचे आमदार निवडून आणणे आणि ५५ लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे. हे आरक्षण बचाव यात्रेचे उद्दिष्ट आहे.
७ ऑगस्ट १९९० रोजी माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ७ ऑगस्टला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याचमुळे हा दिवस ‘मंडल विजय दिवस’ म्हणून साजरा करतात येईल. एससी, एसटी, ओबीसी यांच्या एकतेचे दर्शन या यात्रेत दिसत आहे.