जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, सावित्रीबाई यांच्याविरोधात लिखाण करणारे आरोपी कसे सापडत नाहीत? सरकारची भूमिका संशयास्पद; विरोधकांचा सभात्याग

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण एका संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले होते. त्यावर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र आतापर्यंत ते आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकावरही कारवाई का कऱण्यात आली नाही असा सवाल विधानसभेत उपस्थित केला.

यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, एका बुकीसाठी मध्यंतरी राज्याचे सायबर पोलिस सर्वाधिक सक्रिय झाले आणि संबधिताला अटक करण्यात आली. तर दुसऱ्याबाजूला सावित्रीबाई फुले या आपल्या सगळ्यांच्या आई आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण प्रसिध्द झालेले आहे. मात्र हे लिखाण ज्या संकेतस्थळावर प्रसिध्द झाले त्या संकेतस्थळाचा ठावठिकाणा लागत नाही. लेखकाचा तपास लागत नाही. मग सरकार काय कारवाई करतय असा सवाल उपस्थित केला.

त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांकडून तपास सुरु आहे. सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह लेखन प्रसिध्द करणाऱ्या वेबसाईटवरील त्या मजकूलावर आपण बंदी घातली आहे. लेखकाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र त्याचा तपास अद्याप लागत नाही असे सांगितले.

त्यावर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित करत म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती अत्यंत चुकीचे लिखाण करणारा अजूनही मोकाट आहे. सरकारने असे विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराला मुसक्या बांधून आणले पाहिजे आणि रस्त्यावरून फिरवले पाहिजे, सरकार हे कधी करणार आहे? असा संतापजनक सवाल केला.

त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे तर मत आहे की त्याला नुसत्या मुसक्या आवळल्या नाही गेल्या पाहिजेत त्याला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण नुसते मत असून उपयोग नाही. तर आपल्याला कायद्यानुसार निर्णय घेऊन वागावं लागणार आहे. त्यामुळे संबधित आरोपाली मुसक्याच आवळून आणलं जाईल असे जाहिर केले.

त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘सत्य बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी आपण दोन वर्षांची शिक्षा करतात आणि दुसरीकडे विकृत गुन्हेगार मोकाट फिरतात. आरोपी सापडतच नाहीत, हा कसला न्याय? असा सवाल केला.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर बोलताना, आमच्याही भावना तुमच्यासारख्याच आहेत. गुन्हेगाराला चौकात फाशी दिली पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत मात्र कायद्याने यात कारवाई करावी लागेल. आम्ही ट्विटर इंडियाशी बोलून गुन्हेगाराचा छडा लावू.‘

या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. ठोस कारवाईची मागणी विरोधकांनी केली होती. गोंधळाची परिस्थिती झाली आणि सरकारने बोलू न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

About Editor

Check Also

प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, मला रणनीतीकाराची गरज नाही’ मी प्रॅक्टीकल राजकारणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून पक्षाचे सर्व निर्णय सामूहिक चर्चेने व एकमताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *