चंद्रकांत पाटील यांनी बाबरीप्रकरणी थेट उपस्थित केला स्व. बाळासाहेबांच्या सहभागावर प्रश्न बाबरीचा ढाचा शिवसेनेने नाही तर बजरंग दलाने पाडला

संबध देशात मंडल-कमंडलु राजकारणाचा परिणाम १९९२ च्या डिसेंबर महिन्यात बाबरी मशीदच्या विध्वंसात झाली. त्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशालाच या घटनेचे परिणाम भोगावे लागले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१९ साली या प्रकरणी भाजपा आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना निर्दोष सोडले. त्यानंतर बाबरीचा विध्वंसाचे श्रेयावरून त्यावेळचे भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलेले वक्तव्य आणि तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली कबुली आदींमुळे श्रेयवादाचा मुद्दा थंड बसत्यात पडला. मात्र आता मूळ शिवसेनेत दुफळी पडलेली असताना आणि केंद्रातील मोदी सरकारच्या इशाऱ्यावर सध्या सर्वच राजकिय सुत्रे हलत असतानाच इतकी वर्षे बाबरीपासून लांब पळणारे भाजपाचे नेते आता मात्र बाबरीच्या श्रेयासाठी पुढे येत असून राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा या विषयाला तोंड फोडत बाबरीचा ढाचा पाडण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना अयोध्येत हजर नव्हती तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ती पाडल्याचा दावा एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीला मुलाखत देताना केला.

चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करताना म्हणाले, त्यावेळी ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते की शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? हे जनरलाईज करण्याची गरज नाही. कारसेवक हे हिंदू होते. कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं की हेच करू शकतील आणि त्यांनी केलं ते. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अयोध्येतील सगळा गोंधळ संपल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण तिथून बाहेर पडल्याचं चंद्रकांत पाटील या मुलाखतीत म्हणाले आहेत. मला तर महिनाभर तिथे नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, आता विधानपरिषदेत असणारे हरेंद्र कुमार आणि मी असे रांगेनं तीन राष्ट्रीय सरचिटणीस महिनाभर संध्याकाळच्या सभा, संतांची व्यवस्था हे सगळं बघायला तिथे होतो. आम्हाला असं सांगितलं होतं की बाबरी पडो वा न पडो, शेवटचा माणूस बाहेर पडल्यानंतर तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं. जेव्हा आम्ही तिघं बाहेर पडलो, तेव्हा अयोध्येच्या त्या रस्त्यांवर कुत्री भुंकत होती. अशा वातावरणात आम्ही काम केलं. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे तुम्ही काय तुमचे सरदार पाठवले होते का तिथे? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *