संजय राऊत म्हणाले, मी लिहीणारा माणूस दोन पुस्तके लिहीली पण…

मागील तीन महिन्यापासून पत्राचाळ प्रकरणी तुरुंगात राहिलेले उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना काल जामिन मिळाला. त्यानंतर रात्री ६.४५ वाजता त्यांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले. त्यानंतर आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री येथे जात भेट घेतली. त्यानंतर उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, मी लिहिणारा माणूस आहे. मी वेळेचा सदुपयोग केला. या तीन महिन्याचा कालावधीत दोन पुस्तके लिहीली असून लवकरच प्रकाशित करणार असल्याचे स्पष्ट केले.

पुस्तक किंवा वर्तमानपत्रातील जे जे वाचलं त्यातील आवडलेल्या आणि लोकांपर्यंत गेल्या पाहिजे अशा गोष्टी मी माझ्या डायरीत लिहून ठेवल्या आहेत. त्या डायरीतील गोष्टींचं पुस्तक काढावं आणि ते लोकांपर्यंत पोहचावं असं मला वाटतं. हल्ली लोकांचं वाचन कमी झालं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या हल्लीची मुलं वाचत नाहीत. तरुण लोक वाचत नाहीत, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

मी इतिहासातील काही नवीन माहिती वाचली. काही राजकीय माहिती किंवा इतर घडामोडींबाबत वाचलं, असंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं.

संजय राऊत पुढे म्हणाले, तुरुंगात असताना मी एक सुंदर बातमी वाचली. मला त्या बातमीची गंमत वाटली. केरळमध्ये एका मंदिरात एक शाकाहरी मगर होती. तिचा मृत्यू झाला. मगर शाकाहरी नसते. अनेक वर्षे ही मगर लोक देतील त्या प्रसादावर जगली. त्या मगरीचा मृत्यू झाला. त्यानंतर मंदिर व्यवस्थापन आणि संपूर्ण गावाने या मगरीची अंत्ययात्रा काढली आणि हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. त्या बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं.

अशा अनेक बातम्यांची मी टिपणं केली आहेत. त्या टिपणांचं पुस्तक यावं असं मला वाटतं. ते येईल, असंही संजय राऊतांनी नमूद केलं. ईडीची कारवाई, तुरुंगात भेटलेल्या व्यक्ती अशा विषयावर पुस्तक लिहिणार का या प्रश्नावर मात्र संजय राऊतांनी उत्तर देणं टाळलं.

About Editor

Check Also

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी फिरवला मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षाची मुदतवाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अ-मराठी ऑटो आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा दिला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *