खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषीमंत्र्यांकडून आढावा बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश

यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन केले जात आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी असून वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने २४ लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे. त्यापैकी १३ लाख क्विंटल वितरीत केले असून आणखी ६ लाख क्विंटल वितरणाच्या स्थितीत आहे. तर उर्वरित बियाणे देखील वेळेत वितरीत केले जाईल, असे नियोजन केले जात असल्याची माहिती, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

खरीप हंगाम पूर्व तयारीच्या अनुषंगाने खते, बियाणे उपलब्धतेबाबत मंत्रालयात आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील, बी-बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोंदवले, महाबीजचे कलंत्री, कृषी विद्यापीठांचे बियाणे विभाग प्रमुख, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे पदाधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, सध्या राज्यशासनाने खते व कृषी निविष्ठा यांचे गैरव्यवहार रोखून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी कायदे प्रस्तावित केले आहे. हे कायदे विधिमंडळाच्या विचारार्थ प्रलंबित आहेत. सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावेत तसेच खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण व्हावे, यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देशही मंत्री श्री .मुंडे यांनी दिले.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, बी बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, कृत्रिम टंचाई इत्यादी बाबत शेतकऱ्यांना थेट तक्रार करता यावी व विभागाला व्यक्तिशः ती तक्रार सोडवता यावी, यासाठी शासनाचा व्हाट्सॲप क्रमांक २४ तासात सक्रीय करून शेतकऱ्यांना कळविण्याचे निर्देश दिले .

धनंजय मुंडे म्हणाले की, दरम्यान राज्यात विशिष्ट कंपन्यांच्या बियाण्यांची मागणी केली जाणे, साठेबाजी याबाबतच्या उपाययोजना देखील सुचवल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कापूस-सोयाबीन योजना व अन्य योजनांच्या तसेच महाबीजच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आवश्यक बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आले असून, कुठेही त्याची टंचाई भासणार नाही, असे नियोजन करण्यात येत आहे. कृषी निविष्ठा दुकानांमधून चढ्या भावाने केली जाणारी विक्री, कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात. शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही एखाद्या ठिकाणी विभागाने कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, असेही यावेळी सांगितले.

यावेळी कृषी विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीच्या अनुषंगाने खते, बियाणे उपलब्धतेबाबतची माहिती आढावा सादर केली.

About Editor

Check Also

मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी मानक कार्यप्रणाली जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *