अमोल मातेले यांची सरनाईक यांच्यावर टीका, ते विधान दुर्दैवी आणि अपमानजनक हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाल्याचे विधानावरून केली टीका

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे” असे विधान करून केवळ मराठी भाषेचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा अपमान केला आहे. हे विधान निषेधार्ह, दिशाभूल करणारे आणि संपूर्ण मराठी समाजाच्या भावना दुखावणारे आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिले.

पुढे बोलताना अमोल मातेले म्हणाले की, मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही, तर ही शिवछत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, साहित्यरत्नांचे आणि सामाजिक क्रांतीकारकांचे शहर आहे. इथल्या गल्लीबोळात अजूनही “कसा काय रे?” हे विचारलं जातं, “क्या हाल है?” नव्हे असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

अमोल मातेले पुढे बोलताना म्हणाले की, संविधानिक जबाबदारीचा विसर राज्याचे मंत्रीपद भूषवताना लोकभावना आणि राज्यभाषा यांचा सन्मान राखणे ही एक मूलभूत जबाबदारी आहे. प्रताप सरनाईक यांचे विधान हे त्यांच्या संवैधानिक भूमिकेशी विसंगत असल्याचे सांगत मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांना जनतेचा हिसका मिळेल असा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना अमोल मातेले म्हणाले की, जर मुंबईत हिंदीची जबरदस्ती केली जात असेल, तर ती भाषिक दडपशाही आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मुंबईकराने या प्रकाराचा निषेध करावा आणि मतपेटीतून त्यांना धडा शिकवावा असे आवाहन करत भाषिक समरसतेचा नव्हे तर मराठी विस्मरणाचा डाव आम्हाला सर्व भाषांचा सन्मान आहे, पण मुंबईच्या रस्त्यांवरून मराठी पाट्या गायब करून, सरकारी कार्यालयांमध्ये हिंदीला प्राधान्य देऊन, आणि मंत्री अशा वक्तव्यांद्वारे मराठी भाषेचा अपमान केला जात असेल, तर ती एक धोका देणारी प्रवृत्ती आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी या वक्तव्यप्रकरणी तात्काळ माफी मागावी व विधान मागे घ्यावे अशी मागणी करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ आपले विधान मागे घेऊन महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी. अन्यथा युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागेल असा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

ऊस गाळप हंगामाचे सन २०२६-२७ बाबत धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *