मुख्यमंत्र्यांबरोबरील बैठकीत शरद पवारांनी केल्या या सूचना: लोकलबाबत निर्णय नाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम

मुंबईसह राज्यातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन संख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची एक आढावा बैठक झाली. त्यावेळी शरद पवार यांनी या वाढत्या रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळण्याच्या अनुषंगाने काही सूचना केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईसह रुग्णसंख्या वाढत असली तरीही मुंबईची लोकल बंद करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. ज्या गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्या गोष्टींवर आधीच निर्बंध आहेत. मात्र कठोर निर्बंध लावण्याच्या सूचना प्रशासनाला द्या, तसेच लसीकरण वाढवण्यासाठी शक्य तेवढी कठोर पावलंही उचला, लसीकरण कसे वाढेल, यासाठी आम्हीदेखील प्रयत्न करू, असं आश्वासन पवार यांनी दिले, गॅदरींग, मेळावे, जे आहेत, यासंदर्भातल्या सूचना कठोरपणे पाळल्या पाहिजेत, अनावश्यक गोष्टींसाठी एकत्र येणे टाळले पाहिजे आदी सूचना शरद पवारांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई, ठाणे, पुणे, आदी शहरांमध्ये हळू हळू शाळा-कॉलेज बंद करण्यात येत आहेत. मात्र हे बंद झाल्यावर मुले रस्त्यावर, मॉलमध्ये, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये फिरू लागली तर शाळा-कॉलेज बंद करण्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर काहीतरी आणखी ठोस निर्णय घेण्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आजही ७० ते ८० लाख लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. अनेकांनी फक्त पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस राहिलाय. या सगळ्यांचे कशा रितीने प्रबोधन करता येईल, याविषयीच्या सूचना शरद पवार यांनी मागवल्या. तसेच १० जानेवारीनंतर कोमॉर्बिड आणि ६० वर्षे वयापुढील व्यक्तींसाठी प्रीकॉशन व्हॅक्सीन उपलब्ध होणार आहे. पवार हेदेखील ही लस घेतील, अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शरद पवारांनी बैठकीत दिल्या या सूचना

-कठोर निर्बंध लागू करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना द्या.

-लसीकरण वाढविण्यासाठी शक्य तेवढी कठोर पावले उचला.

-लसीकरण वाढविण्यासाठी आम्हीही मदत करू.

-गर्दी होणारे गॅदरींग-मेळावे संदर्भातील सूचना कठोरपणे पाळल्या पाहिजेत.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *