पवारांच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री करतायत आंबेडकरी जनतेशी जवळीक अजित पवारांकडून भीमा कोरेगांव, चैत्यभूमी, इंदू मिल स्मारकाला भेटी

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही शपथ घेताच आपल्या पदाचा भार स्विकारताच आंबेडकरी जनतेची अस्मितेच्या ठिकाणांना भेटी देत तेथील विकास कामांचा आढावा घेण्याचे काम सुरु केले. त्यामुळे याबाबत दस्तुरखुद्द शरद पवारांनीच याबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेला राष्ट्रवादीच्या जवळ आणण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आंबेडकरी समाज पक्षापासून दूर गेल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच या समाजाला पक्षाला पुन्हा एकदा सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत अशी सूचना वजा आदेश राष्ट्रवादीच्या सर्वांनाच दिला होता.
तसेच २०१४ लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फक्त मराठा समाजाचा पक्ष असल्याची प्रतिमा निर्माण झाली होती. त्याचा फटका त्यावेळच्या दोन्ही निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीला बसला. त्यानंतरही पक्षाने दुरावलेल्या समाजाला पुन्हा पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला मिळणारी आंबेडकरी जनता आणि मागासवर्गीय समाजाची मते वंचित बहुजन आघाडीला मिळाली. त्यामुळे पक्षाच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला.
त्यामुळे आंबेडकरी जनतेला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ आणण्यासाठी उपमुख्यमंत्री पदाची सुत्रे अजित पवार यांनी हाती घेताच पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास भेट देत अभिवादन केले. त्यानंतर आज गुरूवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ असलेल्या दादर येथील चैत्यभूमीला भेट देवून तेथेही अभिवादन केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्मारक होणाऱ्या इंदू मिल येथील स्मारकाचा आढावा घेत ते काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
विशेष म्हणजे अजित पवार हे कधीही चैत्यभूमी, भीमा कोरेगांव येथे अभिवादन करण्यासाठी गेले नव्हते. मात्र आता सत्तेवर विराजमान होताच त्यांनी भेटी देणे सुरु केल्याने आंबेडकरी जनतेला पुन्हा पक्षाशी जोडण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसते.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मंत्रिमंडळाची बैठक

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *