नाराज मंत्र्यांच्या चर्चेवरून मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, आमच्यापैकी कुणीही… जाणीवपूर्वक वावड्या उठविल्या जातायेत

सत्ता स्थापनेनंतर तब्बल ३९ दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतरही ४ ते ५ दिवसांनंतर मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले. मात्र खाते वाटपानंतर दुय्यम दर्जाची खाती मिळाली म्हणून मंत्री दादाजी भुसे आणि संदिपान भुमरे यांनी अप्रत्यक्ष आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या खाते वाटपावरून विरोधकांकडूनही टीकेची झोड उठविली. यापार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क हे मलाईदार खाते मिळालेले शंभुराज देसाई यांनी आपली भूमिका मांडली.

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कुणी मिळालेल्या खात्याबाबत नाराज आहोत असं व्यक्त झालं आहे का? आमच्यापैकी कुणीही असं व्यक्त झालेलं नाही, मत प्रदर्शित केलेलं नाही. मात्र, जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवल्या जात आहेत. असं का होतंय हे आम्हालाही समजत नाही. आम्ही पहिल्या टप्प्यात शपथ घेतलेले शिवसेनेचे नऊ मंत्री आहोत. या मंत्र्यांकडे कोणते विभाग द्यायचे हा पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार आहे.

आम्ही शिवसेनेचे ४० आमदार आणि ११ अपक्ष आमदार सर्वांनी पहिल्याच दिवशी आम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचं का नाही, घेतल्यावर कोणतं खातं द्यायचं या सर्व बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे आमचे कुणीही मंत्री असं बोलत नाहीत. ते स्वतः बोलत नसताना कुणीतरी अशा वावड्या उठवत आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जी खाती दिलीत त्याचं काम त्यांना अभिप्रेत आहे असं करणं यावरच आमचा भर आहे. आम्ही कुणीही नाराज नाही असेही ते म्हणाले.

स्वतः खातं मिळालेले मंत्रीच त्याबाबत नाराजी व्यक्त करत नाहीत, तर केवळ चर्चा आहे आणि कुणीतरी म्हणतंय म्हणून असं बोलणं योग्य नाही. आमच्यात अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नाही असेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *