सुप्रिया सुळे, पटेल यांच्या नियुक्तीवर संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य,…दोन्ही पदं फार महत्वाची शरद पवार हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यावर दुसरं कुणी बोलू नये

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात नवीन नियुक्त्या केल्याची घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली.

दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे कोणतीही नवीन जबाबदारी दिली नाही. पवारांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांची पक्षातील ताकद कमी करण्यासाठी शरद पवारांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

या सर्व घडामोडींनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींवर किंवा अन्य पक्षांच्या अंतर्गत घडामोडींवर दुसरं कुणी बोलू नये. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. आजच्या दिवशी २५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. ही ऐतिहासिक घटना होती. आज २५ वर्षानंतर त्या पक्षामध्ये जर काही नवीन घडामोडी घडत असतील. नवीन लोकांकडे जबाबदाऱ्या दिल्या जात असतील, तर त्यावर आम्ही का बोलावं? शरद पवार हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनीच त्या नियुक्त्या केल्या आहेत. त्या पक्षाचा रौप्यमहोत्सव साजरा होतोय, याला आमच्या शुभेच्छा आहेत.

यावेळी एका पत्रकाराने संजय राऊतांना उद्देशून विचारलं की, तुम्ही शरद पवारांचं राजकारण अगदी जवळून बघितलं आहे. अनेक निर्णयांचे तुम्ही साक्षीदार आहात. अलीकडच्या काळात राष्ट्रवादीत घडलेल्या घटनांचं काय विश्लेषण करता येईल? शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटले की त्यांचा पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला? यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, मला तरी तसं वाटत नाही. अजित पवार हे त्यांच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. तसेच ते विरोधी पक्षनेतेही आहेत. ही दोन्ही पदं फार महत्त्वाची आहेत. एवढंच मी सांगू इच्छितो.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय परभणीतील शेतकरी संवाद मेळाव्यातून मराठा समाजासह सर्व समाजघटकांना न्याय, सन्मान आणि विकास देण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही

मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि अन्य सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *