मुख्यमंत्र्यांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे टीकास्त्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी होती. अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या हितासाठी काय केले हे एका शब्दानेही सांगता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळी करून मुख्यमंत्रीपदाची अप्रतिष्ठा केली अशी टीका केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. माजी आमदार व भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार आणि प्रसिध्दी माध्यमप्रमुख ओमप्रकाश या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी घेतलेल्या सभेत आपल्या सरकारच्या अडीच वर्षांतील कामगिरी विषयी बोलणे अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षांत राज्यातील सामान्य माणसाच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने दमडीही दिली नाही. घरात बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सरकार चालविणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील वेगवेगळया समाज घटकांच्या वेदना, व्यथा कळल्याच नाहीत. आपल्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही हे ठाऊक नाही हे माहिती असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी असभ्य, शिवराळ भाषेचा आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वाशी गद्दारी करत मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या उद्धव ठाकरेंनी आपण सत्तेवर आल्यावर किती रोजगार दिले याचा हिशोब सांगण्याऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागून निवडून आलेल्या शिवसेनेने आता मोदी यांच्यावर टीका करून आपला विश्वासघातकी चेहरा दाखविला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणत होते हिंदूत्व आणच्या हृदयात आहे म्हणून मग २०१९ ला हिंदूत्व सोडून ते तिकडे कसे गेले असा सवाल करत हिंदूत्व त्यांच्यात नसल्यानेच ते तिकडे गेले. जर स्व.बाळासाहेब ठाकरे हे जिवंत असते तर उध्दव ठाकरे हे कधीच मुख्यमंत्री झाले नसते असे सांगत मी शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना जे आठ महिन्यात काम केले तितके कामही दोन अडीच वर्षात उध्दव ठाकरे यांनी केले नसल्याची टीका करत कितीही केले तरी मुख्यमंत्री म्हणून मी केलेल्या कामाची बरोबरी करू शकणार नाही असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाडीबीटीवर २९ नवीन योजनांसह आता १०५ योजना महाडीबीटीमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढले

राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *