राज्याला मोतीबिंदू मुक्त करणार वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचे प्रतिपादन

जळगाव : प्रतिनिधी
पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिरांतर्गत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानातंर्गत पहिल्याच टप्प्यात १ हजार ३१७ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन त्यांना दृष्टी देण्याचे काम करण्यात आले आहे. आजपर्यंत झालेल्या शिबिरांमधील हा एक नवीन उच्चांक असून या अभियानाअंतर्गत दरवर्षी सात लाख रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र साकार करणार असल्याचा विश्वास जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी जळगांव येथील आयोजित शिबिराच्या समारोपाप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २३ नोव्हेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दोन हजार रुग्णांची तपासणी करुन त्यापैकी १ हजार ३१७ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.  याप्रसंगी व्यासपीठावर आमदार स्मिताताई वाघ, महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, डॉ.रागिणी पारेख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर, रामेश्वर नाईक यांचेसह शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई येथून आलेली टीम उपस्थित होती.

               मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात शिबिरे घेण्यात येणार आहे. यासाठी पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांची विशेष नियुक्ती करण्यात येत आहे. राज्यात मोतीबिंदूचे १७ लाखापेक्षा अधिक रुग्ण आहेत. या रुग्णांना या आजारापासून लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी दरवर्षी ७ लाख रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरु राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या अभियानात गेल्या १० दिवसात एकूण १३१७  रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये १२८६  रुग्णांवर मोतीबिंदूचे तर ३१ रुग्णांवर पडद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामधील ५० रुग्णांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हते. त्या सर्वांवर बिनटाक्याचे लेन्स बसवून अगदी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉ.तात्याराव लहाने यांनी सांगितले. तसेच या रुग्णांची येत्या ८ डिसेंबर रोजी पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. तर एम्पथी फाऊंडेशनच्यावतीने या सर्वांना ७ जानेवारी रोजी नंबरचे चष्मे अगदी मोफत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच येत्या ८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात साफसफाई मोहिम राबविण्यात येणार असल्याने या मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही डॉ.लहाने यांनी उपस्थितांना केले. यावेळी आमदार स्मिताताई वाघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

About Editor

Check Also

डॉ राजेश गवांदे यांचे मत, महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आंतरराष्ट्रीय डिजिटल दंतचिकित्सा काँग्रेस २०२६ अंतर्गत उद्योग गोलमेज परिषद

महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, परकीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *