नाना पटोले यांची टीका, मोदींच्या सभेसाठी पैशाची उधळपट्टी, पंडालवरच १३ कोटींचा खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले. विदर्भ मराठवाड्यातील बस मोदींच्या सभेसाठी वापरल्याने जनतेचे हाल झाले. मोदींच्या सभेचा खर्च भाजपाने करण्याऐवजी तो सरकारी तिजोरीतून करण्यात आला आहे. केवळ पंडालवरच १२ कोटी ७३ लाख ३३ हजार ५०० रुपये खर्च केला असून हेलिपॅडसाठी ३.५ कोटी रुपये खर्च केले असून ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, स्वयंघोषीत विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सभेसाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून गर्दी जमवण्यात आली आहे. बसमध्ये महिलांना कोंबून बसवले आहे, एखाद्या वाहनात जास्त लोक बसले तर RTO कारवाई करतात मग यांच्यावर कारवाई कोण करणार? भाजपासाठी कायदा वेगळा आहे का? जनता नरेंद्र मोदी व भाजपाला कंटाळली आहे. मोदींच्या सभेतील खुर्चीवर राहुल गांधी यांचे पोस्टर लावून जनतेने योग्य तो संदेश दिला आहे. याच यवतमाळमध्ये २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दिडपट भाव देणार, स्वामीनाथन अहवाल लागू करणार, सत्तेत येताच पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करणार, अशी आश्वासने दिली होती परंतु सत्तेत येतात मोदी सर्व विसरले आणि तो चुनावी जुमला होता असे म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक केली. यवतमाळ संतांची भूमी आहे, संतांच्या भूमित नरेंद्र मोदी खोटे बोलले. आता यवतमाळची जनता व शेतकरी मोदींच्या भुलथापांना फसणार नाहीत. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, शेतकरीच भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल.

जरांगेच्या एसआयटी चौकशीआडून भाजपाचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

महायुतीत जागा वाटपावरुन मोठा असंतोष व गोंधळ आहे, त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री अंतरावली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांना भेटले होते त्यानंतर नवी मुंबईत जरांगेंचे उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांचा एक OSD सतत जरांगेच्या संपर्कात होता. जरांगे पाटील हे फक्त निमित्त आहेत टार्गेट तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातील तीन आमदारांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसबरोबरच

नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटना मजबूत आहे, काहीजण भितीपोटी पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ते व जनता काँग्रेसबरोबरच आहे. नांदेड जिल्ह्यातील तीन्ही आमदार माधवराव पाटील, मोहनराव हंबर्डे, जितेश अंतापूरकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकारी सर्वजण काँग्रेस पक्षाबरोबरच आहेत. नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचा असून लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार दिला जाणार असून विजयी होणार आहे, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

या पत्रकार परिषदेला खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री अनिल पटेल, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार वजाहत मिर्जा, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी महापौर अब्दुल्ल सत्तार, ज्येष्ठ नेते बी. आर. कदम, केदार पाटील साळुंखे, यांच्यासह नांदेड शहर व जिल्ह्यामधील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *