रमेश चेन्नीथला यांचा इशारा, शेतकरी, बेरोजगार, महिला, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, विपरित परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते निर्धाराने लढले

काँग्रेस पक्ष राज्यात आगामी वर्ष संघटन बांधणीवर भर देत गावपातळीपर्यंत नियुक्त्या करण्याबरोबर सेल, विभाग, सेवादलही मजबूत करणार आहे. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार विकासाच्या नावावर केवळ राजकारण करत असून शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, आमहत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनतेचे हे प्रश्न हाती घेऊन काँग्रेस पक्ष विविध आंदोलने व मोर्चांच्या माध्यमातून सरकारला जाब विचारेल, असे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेयर्स कमिटीची बैठक टिळक भवन मध्ये पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले, वर्किंग कमिटाचे सदस्य नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार चंद्रकांत हांडोरे,  माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, शिवाजीराव मोघे,  आ. अस्लम शेख,  आ. अमीन पटेल,  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी,  रेहाना चिस्ती, खासदार कल्याण काळे, खासदार शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अभय छाजेड, उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी, मुजफ्फर हुसेन, महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआय अध्यक्ष सागर साळुंखे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीने प्रशासकीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला. प्रचंड प्रमाणात पैसा वापरला, हा पैसा आला कुठून, असा प्रश्न विचारून सत्ताधारी पक्षाने लोकशाहीची हत्या केली असे चेन्नीथला म्हणाले. विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दडपशाहीला न भिता निर्धाराने लढले व चांगले यश मिळवले. भाजपा सरकार घोटाळेबाज असून राज्यात गुंतवणूक येत नाही, ती शेजारच्या गुजरात राज्यात जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या विकासाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, ते राजकारण करण्यात व अतंर्गत वादातच गुंतले आहेत.

चंद्रपूर महापौर निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, चंद्रपूरमध्ये महापौरपदासाठी मविआचा घटक पक्ष उबाठा शिवसेनेने काँग्रेसने पाठिंबा द्य़ावा यासाठी चर्चा झाली होती पण त्यांनी ऐनवेळी भाजपाला पाठिंबा दिला पण काँग्रेस पक्षाने मात्र भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी परभणीत उबाठाला पाठिंबा दिला. चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षात कोणतेही अंतर्गत वाद नाहीत, सर्वांशी चर्चा झाली होती. काँग्रेसने चंद्रपूरचा बदला परभणीत घेतला नाही. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी मविआ व इंडिया आघाडीची स्थापना झालेली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे. अजित पवार यांच्या कुटुंबातील लोकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असेल तर केंद्र सरकारने तशी चौकशी केली पाहिजे,अशी मागणीही यावेळी केली.

तसेच रमेश चेन्नीथला म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप काँग्रेस पक्षाशी कोणीही संपर्क साधलेला नाही. जेव्हा तशी विचारणा होईल तेव्हा पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय घेऊ, असेही सांगितले.

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *