संजय राऊतांचा भाजपावर पलटवार, ज्यांचे आव्हान असते त्यांच्याच विरोधात बोंब… भाजपावाले रोज शिमगा करतायत

राज्यातील भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये भाजपाच सत्तेवर येईल असे विश्वास व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा पुन्हा सत्तेत येवू देणार नसल्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या तरूण आमदारांना दिले. या दोघांच्याही वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडत भाजपावर मात्र टीकास्त्र सोडले आहे.

शऱद पवारांनी मी भाजपाला २०२४ मध्ये राज्यात येऊ देणार नाही असे वक्तव्य केल्याप्रकरणी राऊत म्हणाले की, भाजपाला कोणीही घाबरत नाही. जर भाजपा केंद्रीय तपास यंत्रणा, खोटे आरोप, चिखलफेक करुन महाविकास आघाडीचे आमदार, खासदार, नेते यांचे मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे, शरद पवार यांनी जो विश्वास दिला आहे की, घाबरु नका मी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येऊ देणार नाही ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीच्यावतीनेही त्यांनी भूमिका मांडल्याचे स्पष्ट केले.

भाजपातील आमचे मित्र रोज नव्या तारखा देत रंग उधळत आहेत. हे सर्व नकली रंग असून त्यावर केंद्र सरकारचीही बंदी आहे. त्यांना शरद पवारांनी उत्तर दिले आहे. काही झाले तरी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही. लोकशाही आणि राजकारणात प्रयत्न करायला काही हरकत नाही, त्यांनी प्रयत्न करत राहिलं पाहिजेत असा उपरोधिक टोलाही लगावला.

रेड हा त्यांचा आवडता रंग आहे म्हणण्यापेक्षा यात भेसळ आहे. हे भेसळीचे रंग वापरतात. तुमच्या भेसळीच्या रंगाला आम्ही घाबरत नाही. होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोज सुरु आहे. आम्ही जर शिमगा करायला सुरुवात केला तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खणले आहेत आणि त्यात कोण पडेल, कोणाला ढकलले जाईल हे दिसेल असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

शिवसेना मोठा पक्ष आहे, शिवसेनेचे आव्हान आहे. ज्याचे आव्हान असते त्याच्याविरोधात बोंब मारली जाते. भाजपाच्या दंडात ताकद आहे असे त्यांना वाटत असते. पण तसे नाही कारण ते पाठीमागून वार करतात. राजकारणात पाठीमागून होणारे हल्ले पचवायचे असतात आणि आम्ही ते पचवत आहोत असेही सांगत पुढील पाच वर्षे आम्हीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *