११ वी प्रवेशाची सीईटी रद्द केल्याचे आदेश ४८ तासात काढा, न्यायालयाचे आदेश १० वीच्या गुणांवरच ११ वीला प्रवेश द्या राज्य सरकारला निर्देश

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील १० वी च्या विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश घेण्यासाठी सीईटीची परिक्षा देण्याचा पर्याय राज्य सरकारने ठेवला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष परिक्षा घेणे धोक्याचे असून १० वी परिक्षेत मिळालेल्या मार्कावरच ११ वीला प्रवेश देण्यात यावा असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने देत प्रवेशासाठी असलेली सीईटीची परिक्षा रद्द करण्यात आल्याचे आदेशही दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने राज्य सरकारने १० वीच्या परिक्षा घेणे टाळत अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही ११ वी प्रवेशासाठी सीईटी परिक्षा देण्याचा पर्याय शालेय शिक्षण विभागाकडून १० वी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. त्यासाठी २ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने प्रत्यक्ष परिक्षा घेणे अवघड असतानाही पुन्हा सीईटीची परिक्षा का घेण्यात येत आहे असा सवाल करत मग ११ वी प्रवेशाची प्रक्रिया कधी पूर्ण करणार असा सवालही त्यांनी केला.

त्यामुळे ४८ तासात सीईटी परिक्षा रद्द करण्यात आल्याचे आदेश शिक्षण विभागाने द्यावेत असा निर्देश देत १० वी परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच सर्व विद्यार्थ्यांना ११ वीला प्रवेश द्यावा असे आदेश देत आजपासून ६ आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

न्यायालयाने इतक्या क़डक शब्दात फटकारल्याने राज्य सरकारला हा मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सीईटी परिक्षेशिवाय ११ वीला थेट प्रवेश मिळणार आहे.

About Editor

Check Also

आजपासून पेट्रोलच्या दरात वाढ पेट्रोल निर्यात शुल्क १.५ रूपये प्रति लिटर

सरकारने मंगळवारी (१ सप्टेंबर, २०२६) पेट्रोल निर्यात आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) वर पुन्हा शुल्क …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *