राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा पाऊस आणि अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात धीरज देशमुख यांनी नमूद केले आहे की, अपुरा व अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट आणि जमिनीत ओलावा न राहिल्याने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या असून, उभ्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या बिकट परिस्थितीत ग्रामीण भागातील जनजीवन वाचवण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर ठोस उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने बाधित जिल्ह्यांमध्ये तातडीने जिल्हा व तालुकास्तरावर पीक नुकसानीचे पंचनामे करून आवश्यक त्या ठिकाणी त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे (DBT) नुकसानभरपाई जमा करावी, शेती कर्जांचे पुनर्गठन करून व्याज माफ करावे आणि संकटकाळात सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली तात्काळ स्थगित करावी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पावसावर अवलंबून असणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्यासह पशुधनाच्या संरक्षणासाठी चारा छावण्या व चारा बँक तातडीने सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. तात्काळ आर्थिक मदत, पीक संरक्षण आणि दीर्घकालीन उपाययोजनांची सांगड घालून सरकारने बळीराजाला तातडीने आधार द्यावा, असा पुनरुच्चार धीरज देशमुख यांनी केला आहे.
Marathi e-Batmya