मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तर बाळासाहेबांनी मोदींना शाबासकी दिली असती त्यांनी यायला नको होते

अयोध्येत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अयोध्येला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. हा योगायोग असून बाळासाहेब आज असते तर त्यांनी मोदींना शाबासकी दिली असती असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त फोर्ट येथील रीगल सिनेमा चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पुतळ्याला वंदन केलं. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. तसेच बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं असतं. बाळासाहेबांनी मोदींचं अभिनंदन करुन शाबासकी दिली असती, असे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात सर्व घटकांना, सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम आपण करतोय. या राज्याच्या सर्वांगिण विकासाचं काम आपण करतोय. राज्यात बंद पडलेले प्रकल्प आपण करतोय. आपण नवीन प्रकल्प सुरु केले. नवीन योजना सुरु केल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच आम्ही अशाप्रकारचे निर्णय घेतो,असेही सांगितले.

‘त्यांना खरंतर तिथे येण्याची आवश्यकता नव्हती’
काल दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क दादर येथील स्मृतीस्थळावर शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला कुठलाही वाद, संघर्ष याचं गालबोट लागू नये म्हणून मी स्वत:, आमचे आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते कालच स्मृतीस्थळावर गेलो. तिथे नतमस्तक झालो, दर्शन घेतलं. आम्ही तिथून निघालो. आमची लोकं दर्शन घेऊन निघत होते, त्यावेळी ठाकरे गटाचे लोक तिथे आले आणि त्यांनी गालबोट लावण्याचे काम केले. खरंतर तिथे येण्याची आवश्यकता नव्हती. मी आजही तिथे मुख्यमंत्री म्हणून दर्शनाला जाऊ शकलो असतो. आमचे कार्यकर्तेही जाऊ शकले असते. पण वाद नको. चांगल्या कार्यक्रमामध्ये गालबोट नको. बाळासाहेबांना न आवडणाऱ्या या गोष्टी आहेत. काल जे घडलं ते अतिशय दुर्देवी प्रकार होता. मी कालच त्याचा निषेध केला असून सर्वांना शांततेचं आवाहन केल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

समुद्रात शनिवारी झाला कमी तीव्रतेच्या भूकंप; त्सुनामीचा कोणताही धोका नाही किनारपट्टीवरील नागरिक - पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन, अरबी समुद्रातील उच्च भरतीच्या लाटांचा ऑरेंज अलर्टमुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा (High Tide) २४ तासांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *