जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई तर सुरुवात: अमित शाहकडे दाद मागणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

पुणे : प्रतिनिधी

जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाई ही तर सुरुवात आहे, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कवडीमोल किंमतीला ताब्यात घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांची आणि सुतगिरण्यांची चौकशी तपास यंत्रणांच्या रडारवर आहे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिला.

राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे सहकारी साखर कारखाने तोट्यात दाखवून ते जप्त करायचे. नंतर त्यांचा लिलाव करायचा आणि दोनशे कोटीची संपत्ती पंधरा कोटीत खरेदी करायची. त्यावर पुन्हा तीनशे कोटीचे कर्ज घ्यायचे अशा पद्धतीचा गैरव्यवहार राज्यात झाला आहे. अशा सर्व २४ साखर कारखान्यांची खरेदी सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर त्याच्या व्यवहारांची कागदपत्रे उघड झाली आहेत. जरंडेश्वर हे या गैरव्यवहाराच्या बाबतीत हिमनगाचे टोक आहे. यादी मोठी आहे आणि सर्व रडारवर असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारी साखर कारखान्यांची शेकडो कोटींची संपत्ती कवडीमोलाने हडपण्याच्या प्रकाराची चौकशी होण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दाद मागणार आहोत. राजकीय दबावासाठी कारवाई केल्याचा आरोप त्यांनी नाकारला. ते म्हणाले की, कारवाईबद्दल तक्रार करणाऱ्यांनी आधी काही गैरव्यवहार झाला हे तरी मान्य करावे. सध्याच्या काळात चूक करणाऱ्या प्रत्येकाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.

जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरेदी केला आहे. तसेच हा साखर कारखाना खरेदी करताना कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी नेत्या डॉ.शालीनीताई पाटील यांनी केला. तसेच या कारखान्याची मालमत्ता नुकतीच ईडीने जप्त केली. त्यामुळे अजित पवार हे संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. तसेच अजित पवार याप्रश्नी म्हणाले की, जरंडेश्वर कारखाना खरेदी करताना सर्व नियम व अटीप्रमाणेच त्याची खरेदी झालेली आहे. यापूर्वीही त्याच्या खरेदीची सीआयडीमार्फत चौकशी झालेली आहे. त्यामुळे आता पवार कुटुंबियांच्या विरोधात अशा अवैध संपत्तीप्रकरणावरून राजकारण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *