भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, आमच्या त्यांना शुभेच्छा चुकीने ३ जागा कमी सांगितल्या

मागील दोन दिवसांपासून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी लोकसभेच्या ४५ तर लोकसभेच्या २०० जागा जिंकण्याचा संकल्प जाहिर केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने लोकसभेत घवघवीत यश मिळवू अशी घोषणाही नड्डा यांनी केली. नड्डा यांच्या या घोषणेबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत टोला मारत सांगितले की, महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. नड्डा यांनी तीन जागा कमी सांगितल्या असून त्यांनी ४८ जागा जिंकाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

बारामती मधील सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची पाहणी करण्यासाठी आज शरद पवार आले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, पार्थ अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना जे पी नड्डा यांच्या घोषणेबद्दल विचारण्यात आले.

शरद पवार म्हणाले की, भाजपाने खरंतर मिशन ४८ ठरवायला हवं होतं. राज्यात ४८ जागा आहेत. त्यांनी मिशन ४५ करुन चूक केल्याचा टोलाही नड्डा यांना लगावला. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या राज्यात म्हणजेच हिमाचल प्रदेशमध्ये काल परवाच निवडणूक पार पडली. त्यांच्या हातातली सत्ता लोकांनी काढून घेतली. भाजपाच्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना स्वतःच्या राज्यात पक्षाची सत्ता असताना तसेच केंद्रीय सत्तेचे पाठबळ असताना सत्ता टिकवता आली नाही. त्यामुळे त्यांनी अन्य ठिकाणी जाऊन केलेल्या वक्तव्याची नोंद किती गांभीर्याने घ्यायची? असा खोचक सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.

तसेच भाजपाकडून लव्ह जिहादवर कायदा व्हावा यासाठी मोर्चे काढले जात असल्याबाबत शरद पवार बोलताना म्हणाले की, आज केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे लव्ह जिहाद प्रकरणावर ते कायदा करु शकतात. त्याबद्दल मोर्चे काढण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारने कायदा बनवावा, अशी सूचना केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *