हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आदिवासी विद्यार्थ्यांचे १३ दिवसापासून उपोषण, सरकार झोपले आहे का? मंत्र्यांची हकालपट्टी करा आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे भाजपा महायुती सरकारचे दुर्लक्ष, तातडीने प्रश्न सोडवा

राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघर सह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागील १३ दिवसापासून सुरु आहे. राज्यातील भाजपा महायुती सरकार विकासाच्या मोठ्या गप्पा मारते पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, काल मंत्रिमंडळाची बैठक झाली पण त्यातही आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही. भाजपा महायुती सरकार हे आदिवासी विरोधी आहे. या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

नाशिक येथे उपोषणास बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट घेतली, यावेळी त्यांच्यासोबत खासदार शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आदिवासी विभागात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. कोट्यवधी रुपयांचा मलिदा खावून विद्यार्थ्यांना मात्र कोणत्याच सुविधा दिल्या जात नाहीत. १०-१२ दिवसापासून विद्यार्थी उपोषाणास बसले आहेत पण भाजपा महायुती सरकारच्या एकाही मंत्र्याला त्यांची दखल घ्यावी असे वाटले नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रश्नात जातीने लक्ष देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्या मंजूर केल्या पाहिजेत. हे सरकार आदिवासी, दलित, मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना काही झाले तर त्याची सर्व जबाबदारी सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे राहुल गांधी यांना आदिवासींच्या प्रश्नांची अद्ययावत माहिती नाही असे सांगत आहेत, पण तुम्ही ज्या विभागाचे मंत्री आहेत त्याची माहिती तर तुम्हाला आहे का? १३ दिवस तुम्ही झोपा काढल्या का? प्रश्न आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा आहे, वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली मुलींची प्रेगनन्सी टेस्ट केली जाते याचा आहे, पण मंत्री महोदय मात्र त्यावर उत्तर न देता दुसऱ्याच प्रश्नावर बोलत आहेत. हेच मंत्री महाशय, मी काही करू शकत नाही, स्वारी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा असे विद्यार्थ्यांना सांगतात व मुख्यमंत्र्यांना या उपोषणाची दखल घेण्यास वेळ नाही, अशा लोकांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही म्हणाले.

About Editor

Check Also

जयकुमार गोरे यांचे निर्देश, जिल्हा परिषदेच्या शाळा महिन्याभरात सुविधांयुक्त कराव्यात सध्या उपलब्ध पायाभूत सुविधांच्या आधारे शाळांचे वर्गीकरण करावे

आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे ‘ए, बी, सी, डी’ असे वर्गीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *