पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जिवनात २५ वर्ष पूर्ण केली म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करा, असे आवाहन भाजपाकडून करण्यात येत आहे. नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांचा व त्यांच्या पक्षासाठी मोठा असेल पण मुख्यमंत्री ते पंतप्रधान म्हणून २५ वर्षात त्यांनी देशासाठी काय ‘दिवे’ लावले म्हणून त्यांच्या वाढदिवशी ‘दिवे’ लावायचे? नरेंद्र मोदींचा वाढदिवस देशासाठी ‘काळा दिवस’ आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जनता महागाईने त्रस्त आहे, लाखो तरुण बेरोजगार आहेत, शेतकरी संकटात आहे, विद्यार्थी पेपरफुटीने हैरान आहेत, छोटे व मध्यम व्यापारी जाचक करामुळे त्रस्त आहेत. समाजातील एकही घटक मोदी सरकारच्या कामावर समाधानी नाही, असे असताना वाढदिवस कसले साजरे करता? नरेंद्र मोदी यांनी आधी गुजरातची वाट लावली आणि त्यानंतर २०१४ पासून अख्या देशाची वाट लावत आहेत. मोदींचा कार्यकाळ हा सर्वात वाईट कार्यकाळ असून देश २५ वर्षे मागे गेला आहे. जगात भारताची नाच्चकी होत आहे. नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर सरंडर आहेत तर चीनला लाल डोळे करून दाखवण्याची वल्गना हवेत विरली आहे, रुपया ९५ पैशांवर गेला, देशावर कर्जाचा डोंगर रचून ठेवला आहे. केवळ हिंदू मुस्लीम करून समाजात विष पेरण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झाले आहे. मोदींनी दिलेले एकही आश्वासन पर्ण केले नाही. फक्त फेकाफेकी करणे हीच त्यांची कामगिरी असून देशासाठी मोदी अत्यंत घातक पंतप्रधान ठरले आहेत. देशाला पुन्हा उभारी घेण्यासाठी मोठा कालावधी लागेल, असेही सपकाळ म्हणाले.
तातडीने दुष्काळ जाहीर करा…
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यातील अनेक भागात कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे, शेतातील पिकं करपून गेली आहेत, शेतकऱ्यांच्या हातात काहीही राहिले नाही. शेतकरी मोठ्या संकटात आहे पण भाजपा महायुती सरकार मात्र अद्याप मदत देण्यासाठी काहीच करत नाही. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या चर्चा झोडल्या पण बळीराजाला मदत करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतलेला नाही. सरकारची मदत काय शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर मिळणार आहे का? कर्जमाफी जाहीर केली तिही फसवी निघाली. भाजपा महायुती सरकार हे शेतकरी विरोधी असून या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झालेली आहे. सरकारने ‘अभ्यास’ करण्यात वेळ न घालवता तातडीने दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत अशी काँग्रेसची मागणी असे सांगितले.
फडणविसांनी काँग्रेसला सल्ला देऊ नये…
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवलेली आहे, त्यांना आणखी काय जबाबदारी द्यायची हे काँग्रेस पक्ष ठरवेल, त्याची चिंता देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. देवेंद्र फडणविसांनी काँग्रेस पक्षाने काय करावे हे सांगू नये. नरेंद्र मोदी व अमित शाह हे भाजपात कोणालाच काम करू देत नाहीत व कोणाला बोलूही देत नाहीत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी भाजपाची चिंता करावी, काँग्रेसला सल्ले देणे बंद करावे, असे प्रत्यत्तरही दिले.
मराठा आरक्षण प्रश्नी सरकारची आडमुठेपणाची भूमिका…
मराठा आरक्षण प्रश्नी सरकारची आडमुठेपणाची भूमिका निषेधार्ह आहे. एक आंदोलन दीर्घकाळापासून सुरू आहे. सगळ्या समाजाशी
बोलण्याची जबाबदारी सरकराची असते पण या सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नाही.
आरक्षण टिकवून ठेवण्याची जबाबदारी सरकारची होती.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मनोज जरांगे यांना सरकारने दिलेली आश्वासन काय होती हे जाहीर करा. छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ तेंव्हाच्या मुख्यमंत्री यांनीही घेतली होती.आता गणेशोत्सवाचे कारण सांगून हे लोक लपण्याचे कारण सांगत आहेत, देवेंद्र फडणवीस सरकार हेच महाराष्ट्रावरचे मोठे विघ्न आहे.फडणवीस हे केसाने गळा करण्यात माहिर आहेत, त्यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट करावी. जातीनिहाय जनगणनेत जातीचा कॉलम टाकावा ही आमची भूमिका आहे तसेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी ही काँग्रेसची भूमिका आहे असे सांगितले.
अमेरिकेच्या दबावामुळेच UPI टॅक्स…
शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार आधी ऑनलाइन व्यवहार करा असे सांगत होते पण आता मात्र या व्यवहारावर मोदी सरकार कर लावायला निघाले आहे. हा कर लावून मोदी सरकार पाकीटमारी करत आहे. एपस्टिन फाईल मुळे मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले आहेत. अमेरिकेच्या दबावाने घेतलेला हा निर्णय आहे. ऑनलाईन व्यवहारावर कोणताही कर,लावू नये असेही सांगितले.
Marathi e-Batmya