संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, कितीही वाचवायचा प्रयत्न केलात तरीही ते जाणारच सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला राहुल नार्वेकर यांना लगावला टोला

न्यायालयाच्या निकालानंतर दोन महिन्याहून अधिक कालावधी लोटूनही शिवसेनेतील फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १६ जणांच्या अपात्रातेप्रकरणी कोणताही निर्णय न घेतल्याच्या विरोधात ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, राहुल नार्वेकर तुम्ही कितीही टंगळमंगळ केली तरीही तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तु्म्ही कितीही वाचवायचा प्रयत्न केलात, प्राणवायू लावलात, इंजेक्शनं दिली तरीही ते जाणार आणि जाणारच असे सांगितले.

संजय राऊत म्हणाले, राहुल नार्वेकर हे वकील आहेत. मात्र ते ज्या पक्षात ते आहेत तो पक्ष कायदा, नीतीमत्ता या गोष्टी मानत नाही हे तुम्हाला माहित आहे. मात्र राहुल नार्वेकरांना अनेक पक्षांचा अनुभव असल्याने त्यांना कायदा माहित आहे. आपण शिवसेनेचेही वकील होता. सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं आहे तेही तुम्हाला माहित आहे. राहुल नार्वेकर तुम्ही कितीही टंगळमंगळ केली तरीही तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, १६ आमदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १०० टक्के अपात्र ठरणार. तु्म्ही कितीही वाचवायचा प्रयत्न केलात, प्राणवायू लावलात, इंजेक्शनं दिली तरीही ते जाणार आणि जाणारच. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार असा दावाही केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंनी कुणाही बरोबर न जाण्याची भूमिका आत्ता घेतली आहे ती योग्य आहे. माणूस सगळ्यांबरोबर काम करुन शेवटी एक भूमिका घेतो. त्यांनी काय करायचं यावर मी बोलणं योग्य नाही असे सांगत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे भाऊ आहेत. त्यांना एकत्र यायचं असेल तर त्यासाठी कुठल्याही मध्यस्थीची गरज नाही. ते दोघंही एकमेकांना फोन करुन हा निर्णय घेऊ शकतात. मी स्वतः राज ठाकरेंना फोन करु शकतो असे सांगितले.

संजय राऊत म्हणाले, मी राजकारणात नव्हतो तेव्हापासून माझी आणि राज ठाकरेंची मैत्री आहे. राजकारणात उद्या काय घडेल माहित नाही. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? हे काळ ठरवेल. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हे सगळे भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे राजकारणात काहीही घडू शकतं असे संकेतही दिले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *