डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने अभ्यासू, संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड काँग्रेसकडून श्रद्धांजली अर्पण- हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकप्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. समाजवादी विचारांसोबतच महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव असलेल्या डॉ महाजन यांनी आयुष्यभर आपली वैचारिक भूमिका आणि मूल्यांशी असलेली बांधिलकी जपली. महाराष्ट्राने एक अभ्यासू, संयमी नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विद्वान विचारवंत, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते आणि धर्मनिरपेक्ष विचारांचे निष्ठावान पाईक म्हणून डॉ रत्नाकर महाजन यांनी आयुष्यभर समाजाला वैचारिक दिशा देण्याचे कार्य केले. नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रवक्ते म्हणून त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण, परखड आणि विवेकनिष्ठ विचारांनी सार्वजनिक जीवन समृद्ध केले. डॉ महाजन हे अनेकांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या विचारांची प्रगल्भता, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि प्रश्नांकडे पाहण्याचा विवेकनिष्ठ दृष्टिकोन पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी राहील. पुरोगामी, विवेकवादी आणि धर्मनिरपेक्ष महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.

विविध संस्थांच्या माध्यमातून डॉ रत्नाकर महाजन यांनी समाजप्रबोधनाचे मोलाचे कार्य केले. काँग्रेस पक्षाचे मुखपत्र ‘जनमानसाची शिदोरी’ या मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. या माध्यमातून त्यांनी काँग्रेसची वैचारिक भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याबरोबरच तरुण पिढीमध्ये लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि गांधीवादी विचारांची रुजवात करण्याचे काम केले. लोकप्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. वैचारिक स्पष्टता, संयम आणि अभ्यासाच्या बळावर सार्वजनिक जीवनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे डॉ महाजन हे काँग्रेसच्या वैचारिक परंपरेतील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.

डॉ रत्नाकर महाजन यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, राज्यात दुष्काळ जाहीर करून भरीव मदत द्या ओबीसी समाजाला खुल्या प्रवर्गात टाकण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा डाव.

राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडासह अनेक भागात कोरडा दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. शेतकरी चिंतेत असून शेतातील पिके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *