नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा लढा संपलेला नाही, मोदी सरकारच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधातील काँग्रेस पक्षाचा लढा सुरुच राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांना व या रॅकेट मधील सर्वांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, संसदेत यावर चर्चा झाली पाहिजे, विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे रद्द केले पाहिजेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागितल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला .
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, धमेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावाच लागला पण या राजीनाम्याने हुरुळून जाण्याची गरज नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या काळात त्यांनी परिक्षा पद्धतीवर पकड निर्माण करून वन नेशन, वन एक्झामिनेशनच्या माध्यमातून १५२ वेळा पेपर लिक केला, एका वर्ग विशेषाला व भाजपाच्या लोकांना फायदा पोहचवण्यात आला व यातून भ्रष्ट मार्गाने पैसे कमवण्यात आले. नीट परिक्षेसाठी पालक जेवढा पैसा खर्च करतात तो केंद्र सरकारच्या पाच विभागातील खर्चापेक्षा जास्त आहे. या रॅकेटची पाळंमुळं खोलपर्यंत गेलेली आहेत. या सर्वांचा शोध लागल्याशिवाय शांत बसता येणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने काँग्रेस पक्षाने सुरु केलेले आंदोलन थांबणार नाही, कँडल मार्चही होणार आहे, असेही स्पष्ट केले.
Marathi e-Batmya