हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज भाजपा व आरएसएसकडून संविधान संपविण्याचा प्रयत्न, संविधान वाचले तर देश वाचेल, संविधान वाचवण्याच्या लढ्यात सहभागी व्हा

देशात दोन विचारप्रवाह आहेत, एक विचार सर्व जाती धर्मांना समान हक्क व अधिकार देणारा आहे. स्त्री-पुरुष समानता देणारा विचार आहे, हा विचार संविधानाचा असून तोच विचार काँग्रेस पक्षाचा आहे तर दुसरीकडे मनुस्मृतीला मानणारा, राजसत्ता व धर्मसत्ता मुठभर लोकांच्या हाती असावी हा भारतीय जनता पक्ष आरएसएसचा विचार आहे. भाजपा, संघाचा हा फॅसिस्ट विचार देशासाठी व जगासाठी अत्यंत घातक असून या विचारापासून देशाला वाचवण्याची गरज आहे आणि त्यासाठीच संविधान वाचवले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पणजी येथे ॲाल इंडिया कौमी तंजीम आयोजित संविधान बचाव कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमाला गोव्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिनो, माजी केंद्रीय मंत्री इदुराद्रो फालेरो, माजी खासदार रमाकांत खलप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुनाफ हकीम, अजिंक्य देसाई या कार्यक्रमाचे आयोजक कौमी तंजीमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉ. हाझी झाकीर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही व संविधानाच्या मार्गाने देशाची वाटलाच होईल असा निर्णय झाला व त्याच विचाराने मागील ७५ वर्ष देशाची वाटचाल सुरु आहे पण संविधानाला अभिप्रेत असा देश भाजपा व रा. स्व. संघाला नको आहे, त्यांना स्त्री पुरुष समानता नको आहे. स्पृश्य अस्पृशता मानणारा त्यांचा विचार आहे. मनुस्मृतीवर देश चालला पाहिजे हा संघाचा विचार आहे आणि त्याच्या अगदी उलट काँग्रेस पक्षाचा विचार आहे. संघाचा विचार देशाला तारणारा नाही. रा. स्व. संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नागपुरात एक रॅली काढण्यात आली. यावेळी संघाच्या नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले, हा त्यांचा वैचारिक पराभव आहे. संघाला १०० वर्ष पूर्ण होऊनही अजून त्याची नोंदणी केलेली नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची नोंदणी करावी व संविधान स्विकारावे असे आवाहन सपकाळ यांनी केले.

गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले की, संविधान व काँग्रेसचा विचार एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. काँग्रेस संविधानाच्या विचाराने वाटचाल करत आहे. जगात सर्वात श्रेष्ठ संविधान हे भारताचे आहे. या संविधानाचे रक्षण करण्याचे काम काँग्रेस करत आला आहे व यापुढेही करत राहिल. संविधानाने सर्व जाती धर्माला समान अधिकार दिले आहेत परंतु भाजपा मात्र संविधान संपवण्याचे काम करत आहे, त्याविरोधात लढा देण्याची गरज आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधान रक्षणासाठी लढत आहेत. आपले संविधान कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही, यासाठी आपल्याला काम करायचे आहे, असे ठाकरे म्हणाले..

गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यावेळी म्हणाले की, राहुल गांधी संविधान वाचवण्य़ाची लढाई लढत असून हाती संविधानाची प्रत घेऊनच देशभर अभियान राबवत आहेत. संविधान बदलाची भाषा ही २०१४ पासून सुरु झालेली नाही तर संविधान निर्माण झाल्यापासूनच त्याला आरएसएसने विरोध केलेला आहे. आधीचा जनसंघ व आताचा भाजपा हे त्यांचे राजकीय विचाराचे पक्ष संविधानाच्या विरोधात आहेत. या विचाराच्या लोकांनी अनेकवेळा संविधान जाळले आहे व आता ते संविधानाची पायमल्ली करत राजकारभार करत आहेत. या विचाराने भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा झेंड्यालाही विरोध केलेला आहे. स्वातंत्र्याच्या ५०-५५ वर्ष आरएसएसच्या कार्यालयावर तिरंगा फडवला नाही असेही चोडणकर म्हणाले.

About Editor

Check Also

भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून शासनास सुधारणा सुचविणार

राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *